<p><strong>सातपूर | प्रतिनिधी </strong></p><p>केंद्र सहायक पदासाठी एस ई बी सी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आले. त्यामुळे नाशिक महावितरण कार्यालयाच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध करून महावितरण सर्कलच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. </p><p>महावितरण विभागात उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आणि त्या अनुषंगाने दि-1 व 2 डिसेंबर 2020 रोजी कागदपत्रे पडताळणी कार्यालयात होत आहे. </p><p>परंतु या कागदपत्रे पडताळणीमधून मराठा समाजातील एस ई बी सी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय आहे.एस ई बी सी प्रवर्गातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा दि-1 व 2 तारखेला कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्यात यावी.</p><p>मराठा समाजातील मुलांना भरती प्रक्रियेत डावलून एक प्रकारे मराठा समाजाची अवहेलना केली जात आहे. या विरोधात मराठा समाजात प्रचंड संतापाची भावना असल्याची भावना व्यक्त होत आहे.</p><p>महावितरणच्या उपरोक्त कृतीचा सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करीत असून उपरोक्त चूक तात्काळ सुधारण्यात यावी अन्यथा मराठा समाजातून याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार, नाहीत अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. </p><p>२९ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथे पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयास अनुसरून सदर न्याय्य मागणीसाठी आज (दि.१) व उद्या (दि २) रोजी अधिक्षक अभियंता महावितरण कार्यालय येथे सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले.</p><p>यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, गणेश कदम, राजू देसले, उमेश शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, विजय खर्जुल, ज्ञानेश्वर भोसले, गणेश दळवी, ऋषिकेश कदम, शुभम बोराडे, विशाल नवले, ओम गाडेकर, आद्वान शेख आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.</p>