नाशिक । Nashik
महाराष्ट्राला तसेच महाराष्ट्र पोलीसांनाही मोठा इतिहास आहे. इतर राज्यातील महाराष्ट्राच्या मातीशी नाळ न जुळलेले कोणीही ऐरे गैरे उठतात व पोलिसांवर टिका करतात.
मात्र त्यांना भ्यायचे काम नाही, त्यांच्या टिकांकडे दुर्लक्ष करुन तुमच्यातील कर्तत्वाने अशा प्रवृत्तींना दूर करावे. करकरे, कामठे, साळसकर यांचा आदर्श घेतल्यास महाराष्ट्र पोलीस जगात एक नंबर राहतील असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यांनी येथे केले.
नाशिक पोलीस मुख्यालयात पोलीस सदभावना उपक्रमांअंतर्गत उभारण्यात आलेल्या शहिद अशोक कामटे पेट्रोलपंप व शहिद हेमंत करकरे फायरींग रेंजच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
सामंत म्हणाले, शहिद करकरे, कामटे यांच्या कामाचा आदर्श आपल्यासमोर दिपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने पोलिसांनी काम करुन पोलिसांचे नाव सर्वसामान्य जनतेत रुजवावे.
चित्रपट अभिनेत्री कंगना रानावतने पोलीसांवर केलेल्या आरोपांचा समाचार घेताना ज्यांची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेली नाही असे ऐरे - गैरे पोलीसांवर टिका करत आहेत. पोलीस दल 24 तास समाजाचे सरंक्षण करतात, त्यामुळे आम्ही सुखाने जोपतो. पोलिसांमधील कर्तृत्व जगाने पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी टिकेकडे दुर्लक्ष करुन जनतेची सेवा करावी.
मी दौर्यावर येण्यापुर्वी अनेक संघटनांकडून माझी गाडी आडवणार, दगडफेक करणार अशा धमक्या देण्यात येत होत्या. परंतु पोलीसांच्या तत्परतेमुळेच आम्ही कुठेही फिरू शकतो. तर अशा धमक्या देणार्या संघटनांचाही सत्कार करण्याची गरज आहे.
याप्रसंगी खा. हेमंत गोडसे, पोलीस आयुक्त दीपक पांड्ये, भारत पेट्रोलियमचे रमन मलिक, उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, लक्ष्मण पाटील, विजय खरात, अमोल तांबे तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरिक्षक आदी अधिकारी उपस्थित होते.
परिक्षा रद्दचा उपक्रम आपणच राबवला
करोना असला तरी अनेक चांगले उपक्रम पोलीस तसेच विविघ संघटना राबवत आहेत. बाहेर पडल्यानंतर अशा उपक्रमांना हजेरी लावल्याचे सार्थक होते. पोलीसांनी राबवलेले उपक्रमही स्तुस्त आहेतच . पण आपणही परिक्षा रद्द करण्याचा उपक्रम चांगलाच केला. शेवटी मुलांच्या आयुष्याचा प्रश्न महत्वाचा असल्याचे सामंत यांनी यावेळी बोलताना सांगीतले.