घोटी | Ghoti
उभाडे (Ubhade) (ता. इगतपुरी) माळ राणावरील आदिम कातकरी समाजाच्या अल्पवयीन चिमुरडीला मेंढ्या चारण्यासाठी नेत मारहाण करून गळफास लावून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सात दिवसांनंतर या चिमुरडीचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) गुन्हा दाखल होऊन संगमनेर पोलीस ठाण्याकडे (Sangamner Police Station) वर्ग करण्यात आला आहे....
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उभाडे येथील कातकरी वस्तीमधील तुळसाबई सुरेश आगीवले यांनी तीन वर्षांपूर्वी आपली मुलगी गौरी (वय १०) हिला घरची परिस्थिती जेमतेम असल्याने संशयित आरोपी विकास सीताराम कुदनार रा. शिंदोडी (ता. संगमनेर) याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात पाठवले होते.
संशयिताने काही दिवस चिमुरडीला चांगले सांभाळत असल्याचे भासवले. दि. २७ ऑगस्टच्या मध्यरात्री गौरी हिस उभाडे येथील आगीवले कुटुंबीयांच्या झोपडी वजा राहत्या घराजवळ विकास कुदनार व त्याच्या साथीदारांनी तिला टाकून पलायन केले.
आपल्या घराजवळ कोण आहे हे पाहण्यासाठी तुळसाबाई गेल्या असता त्यांना धक्का बसला. लाल चादरीत गुंडाळून बेशुद्ध अवस्थेत असलेली मुलगी गौरी असल्याचे समजताच हंबरडा फोडला. आवाज ऐकून वस्तीमधील काही कुटुंबातील सदस्य जागे होऊन त्यांनी तिला सिन्नर घोटी मार्गावरील वाहनामधून घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, तालुका अध्यक्ष गोकुळ हिलम, सचिव सुनील वाघ यांना घटना समजताच गौरी हिची तब्येत गंभीर असल्याने तिला रूग्ण वाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सात दिवसांच्या उपचारादरम्यान गौरी हिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काही मेंढपाळ हे पैशाचे अमिष दाखवून लहान बालके मेंढ्यासोबत घेऊन जातात. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ करतात. या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. आपल्या आई-वडिलांपासून कोसो दूर असलेल्या त्या चिमुरडीने असा कोणता गुन्हा केला असावा इतके निर्दयीपणे तिला गळफास,अंगाला चटके देत क्रूरतेने मारहाण केली. या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची भेट घेऊन संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
आदिम कातकरी समाजाची इगतपुरी तालुक्यात सुमारे १४०० कुटुंब राहतात. यातील काही वीटभट्टी, खडी फोडणे, मासेमारी करून उदरनिर्वाह करत असतात. गावकुसाला अथवा माळरानावर राहणाऱ्या कुटुंबियांना पैशाची लालच दाखवून विविध कामाला घेऊन त्यांना बंधबिगारीला लावले जाते. तालुक्यातील अनेक जोडपे, लहान बालके यांना वेठबिगारीकरिता नेवून मानसिक, कौटुंबिक त्रास दिला जातो. याबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.