निफाड | Niphad
गेल्या काही महिन्यापासून वडाळी नजिक शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.
गेल्या दोन दिवसांंपूर्वी वडाळी नजिक शिवारात गंगापूर तट कालव्यालगत राहणारे भास्कर टर्ले यांचे डाळींब शेतात रात्री 10 वाजेच्या सुमारास येथील शेतकरी संतोष घोलप यांना बिबट्याने दर्शन दिले. वडाळी नजिक शिवारात अनेक शेतकरी शेतीकामानिमित्त वस्तीवर राहतात.
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकर्यांनी दुभती जनावरे पाळली आहेत. त्यातच सायंकाळी वीजभारनियमन मोठ्या प्रमाणात होत असल्याने दुभती जनावरे सांभाळावी कशी असा प्रश्न शेतकर्यांना सतावू लागला आहे.
सध्या द्राक्षबागेच्या कामांसह कांदा, गहू, हरभरा, मका लागवड सुरू असून शेतीमशागतीसाठी शेतकर्यांना रात्रीचा दिवस करुन पीकांना पाणी द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत आता शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरी, शेतमजूरांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.
हा परिसर बिबट्यामुक्त करण्यासाठी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी आता शेतकर्यांमधून जोर धरू लागली आहे.