नांदगाव । Nandgoan
काशी, महानगरी, कामायनी, झेलम पाठोपाठ कृषीनगर एक्स्प्रेसचादेखील जानेवारीपासून थांबा रद्द करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनातर्फे पत्राव्दारे हे स्पष्ट करण्यात आल्याने नांदगावकरांंसह परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
नांदगाव रेल्वे स्थानकात महाराष्ट्र एक्स्प्रेस एकमेव रेल्वे गाडीचा थांबा देण्यात आल्याने रेल्वे प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
नांदगाव रेल्वे स्थानकावर नियमित जेमतेम रेल्वे प्रवासी गाड्याचा थांबा आहे. असे असतांना महाराष्ट्र एक्सप्रेस वगळता सर्व रेल्वे गाड्याचे थांबे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. गेल्या डिसेंबर काशी, कामायनी, महानगरी, झेलम, पाठोपाठ जानेवारी पासून कृषिनगर एक्स्प्रेसचा थांबा रद्द करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्र एक्स्प्रेस गाडीचा थांबा सुरळीत सुरू आहे.
नांदगाव पाठोपाठ रावेर रेल्वे स्थानकातील काशी, कामायनी, महानगरी, झेलम, जनता, कृषिनगर एक्स्प्रेस या सर्व गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासनाने रद्द केले होते. मात्र खा. रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे रावेर स्थानकावरील सर्व रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यात आले आहे.
रेल्वे गाड्याचे थांबे पूर्ववत करण्यासाठी जन आंदोलन छेडण्याचा इशारा रेल्वे सल्लागार समितीचे अध्यक्ष तुषार पांडे यांनी दिला आहे.