जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरवात

बळीराजा मशागतीत व्यस्त
जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरवात

नाशिक | Nashik

करोनाची भिती दूर सारुन खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीत जिल्ह्यातील बळीराजा गुंतला आहे.

रब्बीतील सर्व पिकांची काढणी पूर्ण झाली असली तरी लॉकडाऊनचा मोठा फटका बसल्याने उत्पादन चांगले येऊनही बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले आहे. आर्थिक नुकसान, करोना या सर्व अडचणी बाजूला सारुन पावसाळा तोंडावर आल्याने खरीप पिकांची लागवड करण्यासाठी पेरणीपूर्व मशागत सुरु झाली आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीपाचे उत्पन्न हातचे गेल्याने शेतकरी संकटात सापडला.

रब्बीच्या अपेक्षांवर करोनाने पाणी फेरले, मात्र यंदा तरी खरीप पिके चांगली येतील, या आशेवर बळीराजा आहे. बैल आणि ट्रॅक्टरने नांगरणी, गवत पालापाचोळा नष्ट करणे, खते टाकणे, पलटी नांगर, ढेकळे फोडण्यासाठी व जमीन भुसभुशीत होण्यासाठी रोटर फिरवणे आदी कामे सुरु आहे.

खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे, खते, मशागतीसाठी लागणार्‍या खर्चाची समस्या आहे. खरीप कर्जपुरवठ्यात अडचणी येत आहे.मात्र त्यावर मात करीत प्रामुख्याने टोमॅटो, भुईमूग, सोयाबीन या लागवडीवर भर दिला जाणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाच्या घरसणार्‍या दरामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. पूर्वी जमिनीची मशागत बैलजोडीच्या मदतीने केली जात असे. त्यामुळे शिवारामध्ये मे महिन्यात बैलांच्या गळ्यातील गोघर-घाटीचा मंजूळ आवाज ऐकाव्यास मिळत असे.

परंतु बदलत्या काळानुसार व विज्ञान युगामध्ये शेतीची मशागत ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाऊ लागली आहे. त्यामुळे आता बैलांची संख्या कमी झालेली अगदी मोजक्या शेतकर्‍यांकडे बैलजोडी दिसून येत आहे तर ठराविक कामे बैलाच्या साह्याने केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com