
ओझे | विलास ढाकणे | Oze
दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या तीन दिवसात एक रात्र व एक दिवस म्हणजे जास्तीचा जोरदार पाऊस (Rain) फक्त २४ तास पडल्यामुळे पालखेड, वाघाड धरणांमध्ये समाधानकारक पाणी (Water) आले आहे. यात वाघाड धरण (Waghad Dam) १०० आणि पालखेड धरण ९७ टक्के भरले असून मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पातून पुणेगाव धरणात पाण्याची आवक चांगली आहे.
तर पुणेगाव धरण (Punegaon Dam) ९४ टक्के भरले असून धरणातून उनंदा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग चालू असल्यामुळे ओझरखेड धरणाच्या (Ozharkhed Dam) पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. ओझरखेड धरणाचा पाणीसाठा ८६ टक्क्यांवर पोहचला असून वणी दिंडोरीसह चांदवड पाणीयोजना बरोबर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याप्रमाणेच मांजरपाडा प्रकल्पातून (Manjarpada Project) पाण्याची आवक चालू असल्यामुळे दोन दिवसात ओझरखेड १०० टक्के भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी तालुक्याच्या पश्चिम परिसरामध्ये समाधानकाराक पाऊस झाल्यामुळे करंजवण धरणात पाण्याची आवक चालू असल्याने करंजवण धरणाचा (Karanjavan Dam) पाणीसाठा ८८ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे करंजवण धरण लवकरच पूर्णक्षमते भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, तालुक्यातील तिसगाव धरणाची पाण्याची परिस्थिती अजूनही चिंताजनक असून तिसगाव धरणात आज मितीस फक्त ३० टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच तिसगाव धरण (Tisgaon Dam) पुणेगाव धरणाच्या कॅनलने भरता येवू शकते. जोपर्यंत मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पातून पाण्याची आवक चालू आहे तोपर्यत. तिसगाव धरण भरण्याची मोठी संधी असल्याचे परिसरातील शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. विशेष म्हणजे करंजवण व ओझरखेड धरण लवकर भरण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे दिंडोरी तालुक्यासह येवला, मनमाड, चांदवड, निफाड तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दिंडोरी तालुक्यातील आजचा धरणाचा पाणीसाठा
करंजवण ८८ टक्के
पालखेड ९७ टक्के
पुणेगाव ९४ टक्के
वाघाड १०० टक्के
ओझरखेड ८६ टक्के
तिसगाव ३० टक्के