
नाशिक | प्रतिनिधी
नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली असली तरी छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत ३७ टक्क्यांपेक्षा कमी साठा राहिल्यास पाणी सोडावे लागणार आहे. सद्यःस्थितीत धरणात ४५ टक्के साठा असल्याने दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच दिवाळीनंतर ५४ टक्के साठा अपेक्षित आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
शहरासाठी नाशिक महापालिकेने गेल्यावर्षी पेक्षा तीनशे दलघफू पाणी आरक्षण वाढवून सहा हजार १०० दलघफू पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. ही मागणी फेटाळली जाण्याची शक्यता असून, १५ ऑक्टोबरला पाणी आरक्षणासंदर्भात बैठक होणार आहे.
जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, कडवा, पालखेड, नांदूर मधमेश्वर आदी महत्त्वाच्या धरणांत शंभर टक्के साठा असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता नाही. पण जायकवाडीला पाणी सोडावे लागते. सप्टेंबर महिन्यांत या धरणांतून ९ टीएमसी पाणी पैठण धरणाकडे गेले. त्यामुळे या धरणात सद्यस्थतीला ४५ टक्के जलसाठा आहे.