
नांदगाव । प्रतिनिधी
नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी मी माझ्या परीने सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला नाही तर सरकारच्या विरोधात न्यायालयात पीटिशन दाखल करेल. माझ्यावर अन्याय होत असेल तर मी राजीनामा देवून सरकारच्या विरोधात भूमिका घेणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगत सरकारलाच घरचा आहेर दिला आहे.
नांदगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यात समावेश झाला नसल्याच्या पार्श्वभूमीवर येथील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना आमदार कांदे म्हणाले की, संदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेणार असून दुसऱ्या टप्प्यात नांदगाव तालुक्याचा समावेश नक्कीच केला जाईल असा विश्वास व्यक्त केला.
नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर व्हावा यासाठी राज्य सरकारकडे सर्व पूर्तता करूनही राज्य सरकारने नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला नसल्याने नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. आमदार कांदे म्हणाले की, नांदगाव तालुका दुसऱ्या यादीत असणार असल्याचे मंत्र्यांनी मला तोंडी उत्तर दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रस्ताव मंत्रालयात संबधित विभागात सादर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अद्यापही एकही तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेले नाही. जे जाहीर करण्यात आले आहे ते सरकारच्या एका सर्वेक्षण ऐजन्सीचा हवाला घेऊन जिल्ह्यातील तीन तालुके जाहीर करण्यात आले आहेत. शासनाने अधिकृतपणे एकही तालुका जाहीर केलेले नाही. दुष्काळ परिस्थितीत आपला तालुका बसतो. कागदपत्रांची शहानिशा करण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली असल्याचे त्यांनी सांगितले तालुका दुष्काळात कसा बसतो यासाठी प्रयत्न करणार आहे.
याबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांशी आम्ही बैठका घेतल्या आहेत चर्चा केल्या आहेत. शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. ज्या दिवशी राज्यातील तालुके दुष्काळग्रस्त जाहीर होतील त्यात नांदगाव तालुका असणार असे आमदार कांदे यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान दुष्काळग्रस्त तालुका जाहीर होण्यासाठी शासनाच्या आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी अनुकूलता असून जिल्ह्यात सर्वात कमी ३६ पैसे पर्यंत आणेवारी नांदगाव तालुक्याची आहे, जून ते सप्टेंबर महिनाअखेर अखेर पडलेला पाऊस केवळ ६४ टक्के आहे. खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये नांदगाव तालुक्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितींतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते.
त्यानुसार नांदगाव तालुक्यातील सर्व आठही महसूल मंडळांमध्ये नजर अंदाज सर्वेक्षणानुसार अपेक्षित सरासरी उत्पादकता २५ टक्क्यांपेक्षा कमी आली होती. म्हणजेच पिकांचे होणारे नुकसान हे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त होणार असल्याचे दिसून आले होते. बहुतेक पिकांखालील क्षेत्र पाण्याअभावी करपले होते.
तालुक्यात ऑगस्टमध्ये चार आठवड्यांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, मदत व पुनर्वसन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.
तालुक्यात पस्तीस टंचाईग्रस्त चौतीस गावे व १५८ वाड्या वस्त्यासाठी दररोज ८३ फेऱ्या टँकरद्वारे सुरु आहेत यावरून पाण्याच्या स्थितीचा अंदाज येतो. पावसाने पाठ फिरवल्यामुळे टँकरची संख्या वाढवण्यात आली आहे. उपलब्ध जलसाठे मृत अवस्थेत आहे. तालुक्यातून अद्यापही चाऱ्याची मागणी आलेली नसली तरी भविष्यात चारा टंचाईच्या झळा बसणार आहेत.
या बैठकीस तहसीलदार सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, कृषी अधिकारी आर.जी डबाळे, अधिकारी, कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..