
त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar
येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले होते. तसेच पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला होता. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात होती...
त्यानंतर देवस्थान ट्रस्ट आणि ब्राम्हण महासंघाने त्र्यंबकेश्वर पोलिसांना (Trimbakeshwar Police) पत्र लिहून याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच राज्य सरकारने सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेत याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
तर पोलिसांनी देखील याप्रकरणी तपास करत ५ जणांवर गुन्हे दाखल केल्याचे बोलले जात आहे. अशातच आज काँग्रेसचे (Congress) माजी खासदार हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत मंदिराच्या प्रवेशद्वारावर जाऊन दर्शन घेतले. तसेच पायरीजवळ जाऊन हात जोडत मोबाईलमध्ये मंदिराचे फोटो घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, "मी त्र्यंबकेश्वरमधील लोकांचे स्वागत करायला आलो आहे. इतकं सगळं होऊनही लोकं शांत राहिली. जिथे परवानगी असते तिथेच दर्शनाला जातो, येथे धार्मिक सलोखा आहे, काही लोक ते बिघडवण्याचे काम करत आहेत. काही संघटना येथे येऊन काय करतात? त्यांच्यावर कारवाई करा. याठिकाणी येऊन मनुस्मृती लादायची आहे का? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, महात्मा गांधी होण्याची गरज आहे", असे दलवाई यांनी म्हटले. तसेच मुस्लिम समाजाने शांत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.