हरसूल | Harsul
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला असून,पावसाअभावी पिके करपून संकटात सापडली आहेत. यामुळे सर्व स्तरावरून प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुख्य पिके भात, नागली, वरई हे पिके घेतली जातात. सुरवातीच्या पावसावर या पिकांची भरघोस लागवड करण्यात आली. परंतु गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने ही पिके जळून जात आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
यावर्षी उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. भात, नागली, वरई, मका, भुईमूग, तूर या सारख्या पिकांची लागवड केली असून जूनच्या सुरवातीचे काही दिवस पाऊस पडला होता. मात्र नंतर पावसाने जी पाठ फिरवली ती अद्याप तशीच आहे. अर्थात जून नंतर दोन महिने झाले तरी पाऊस पडलेला नाही. अजून आठवडा भर पाऊस झाला नाही तर जे हिरवे शेत दिसते तेही सुकून त्याचा पेंढा तयार होईल, याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतली आहे.
या सर्वांचे शासनाने झालेल्या पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्र्यंबकेश्वर तालुक्यातून परिसरातून होत आहे. त्यासाठी (दि.०३) तालुक्यातील काही मोजक्या शेतकरी व हरसूल येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मा.आर.एल. राठोड यांना त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात दुष्काळ जाहीर करण्यात यावा या संबंधीचे निवेदन देण्यात आले.