
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
त्र्यंबकेश्वर-पेठ तालुक्याच्या तालुका सीमावर्ती भागातील सारस्ते, आमलोण, अभेटी, ससुने, कुळवंडी, बर्डापाडा, गावंध, नाचलोंढी तसेच परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस झाला...
यामुळे पाळीव जनावरांच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. घरांचे पत्रे, आंबा, काकडी, जनावरांचा चाऱ्यासह घरांच्या भिंतींचे अतोनात नुकसान झाले आहे.
या नुकसानग्रस्त भागाची माजी आमदार धनराज महाले,माजी जि..प.सदस्या रुपांजली माळेकरांकडून पाहणी करण्यात आली आहे.
हरसूल जवळील सारस्तेसह आमलोण व परिसरात सोमवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला. पावसाचा वेग आणि गारांचा तडाखा अतिशय जोरात असल्याने पाळीव जनावरांच्या पाठीवर जखमा झाल्या असून ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार घराचे पत्रेही फुटले आहेत.
वाऱ्याच्या वेगाबरोबरच गारांचा वेग तितकाच जोरदार असल्याने अनेक कुटुंबे नुकसानबाधित होऊन उघड्यावर पडली आहेत. या पावसाने अनेक घरांचे छत हरवले आहे. यामुळे अनेक गाव-पाडे या जोरदार अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्याने नुकसान बाधित झाले आहेत.
आमलोणचे माजी सरपंच प्रकाश भोये यांच्या घरासह शंभरहून अधिक घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे. याच शिवारातील देवकीबाई हिरामण गायकवाड यांच्या घरावरील ११२ सिमेंट पत्र्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अभेटी येथील शेतकरी नामदेव लहानु सहारे यांच्या शेतात दोन दिवसांपूर्वी बसविलेल्या सोलरची मोठी दुरवस्था झाली आहे. आंबा, काकडी, पिकासह जनावरांचा चारा भिजून मोठे नुकसान झाले आहे.
माजी आमदार धनराज महाले, माजी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर यांनी नुकसानीची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, पं. स. माजी सभापती अंबादास चौरे, सरपंच वनिता भोये, प्रकाश भोये, दिलीप चौधरी, नंदराज गवळी, रघुनाथ गवळी, धर्मराज चौधरी, पोलीस पाटील दिनकर चौधरी, जगन पिंपळके, मंगल चौधरी, रमेश भोये, सरपंच परशराम मोंढे, किरण वाघाईत, जानकीराम गायकवाड, कृषी मंडळ अधिकारी व्ही.एम. कातकाडे, ग्रामसेविका प्रमिला बडे, प्रल्हाद गायकवाड, जयराम डगळे, एकनाथ लहारे, रघुनाथ लहारे, भगवान घुटे, रोहिदास राऊत, विष्णू कुवर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमवारी झालेल्या पावसात अनेक घरांसह अन्नधान्य भिजले असून आज मंगळवारी अन्नधान्य वाळविण्यासाठी लगबग दिसून आली.
पेठ तालुक्यात अवकाळी पावसाने काही भागात गारांच्या तडाख्याने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक गावातील घरांचे मोठे नुकसान झाले असून जनावरांच्या पाठीवर मोठ्या जखमा झाल्या आहेत. शेती पिकाला या पावसाचा जोरदार फटका बसला असून जनारांचा चारा नुकसान बाधित झाला आहे.शासनाकडे ग्रामस्थांच्या नुकसानीबाबत पाठपुरावा करून नुकसान भरपाई मिळवून देण्यास प्रयत्नशील राहणार आहे.
- धनराज महाले, माजी आमदार, पेठ-दिंडोरी मतदारसंघ
त्र्यंबकेश्वर-पेठ तालुक्याच्या तालुका सीमावर्ती भागातील गाव पाड्यात अवकाळीने पावसाने गारांसह दमदार हजेरी लावली आहे. या पावसाच्या तडाख्याने अनेक घरांचे पत्रे, शेती पिकांचे व जनावरांच्या चाऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून अनेक ग्रामस्थ उघड्यावर पडली आहेत. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
- रुपांजली माळेकर, माजी जि. प. सदस्या.