नाशिक | Nashik
विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या (युजीसी) परीक्षा घेण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्त्वांविरोधात दाखल जनहित याचिकांवर सर्वाेच्च न्यायालयात येत्या ३१ जुलै राेजी सुनावणी हाेणार आहे. युवा सेनेनेही याचिका दाखल केली आहे.
पदवी परीक्षांसंदर्भातील सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात साेमवारी (दि. २७) सुनावणी झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाने ६ जुलै २०२० रोजी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करून सर्व विद्यापीठांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्र परीक्षा सप्टेबर अखेर घेण्याचे निर्देश दिले आहेत. या परीक्षा घेणे बंधनकारक असल्याचे यूजीसीचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात कराेनामुळे परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही. यासंदर्भात यूजीसीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली. यूजीसीच्या गाईडलाइन्सविरोधात विविध ३१ विद्यार्थ्यांनी मिळून २७ याचिका कोर्टात दाखल केल्या आहेत. महाराष्ट्रातील युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी देखील दाद मागितली आहे.
न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर ही सुनावणी झाली. विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन परीक्षा रद्द करा, अशी युवासेनेसह अन्य याचिकाकर्त्यांची मागणी आहे. दरम्यान, युवासेनेने दाखल केलेल्या याचिकेला विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक कर्मचारी आणि संघटना पत्रे पाठवून पाठिंबा देत आहेत, अशी माहिती वरूण सरदेसाई यांनी दिली. तसेच साेमवारी झालेल्या सुनावणीत यूजीसीला या संदर्भात उत्तर देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.