<p><strong>नाशिक | Nashik (प्रतिनिधी)</strong></p><p>राज्याच्या आरोग्य विभागातील पदभरती महिन्याच्या आत परीक्षा घेऊन होणार आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.</p>.<p>यापूर्वी पदभरती ही दहावी, बारावीच्या गुणांवर होणार होती. त्याविरोधात हजाराे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.</p><p>राज्य सरकारने आरोग्य विभागातील १७ हजार पदांसाठी भरती प्रक्रिया गुणवत्तेनुसार (दहावी, बारावी, पदवीच्या गुणांवर); तसेच मुलाखतीद्वारे राबविल्यास राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या असंख्य उमेदवारांना संधीच मिळणार नसल्याचे समोर आले होते. दहावीच्या 'बेस्ट ऑफ फाइव्ह' निकालामुळे आणि बारावीच्या वाढलेल्या गुणांमुळे अनेक स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी मागे पडणार आहेत.</p><p>त्यामुळे या भरतीला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध झाला होता. ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, या पदांसाठी विद्यार्थी तीन ते पाच वर्षांपासून तयारी करीत आहे, भरती प्रक्रियेत दहावी आणि बारावीच्या गुणांचा विचार केल्यास खूप कमी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.</p><p>मात्र, ही भरती परीक्षा घेऊनच पार पडली पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली हाेती. 'करोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती असल्याने पदभरती मेरिटनुसार घेण्याचा विचार होता.</p><p>मात्र, आता राज्यात सर्व क्षेत्र खुले होत असल्याने, एकूण पदभरतीच्या पन्नास टक्के जागा एका महिन्याच्या आत परीक्षा घेऊन भरणार आहे. रोस्टर तयार करण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी जाईल. त्यानंतर पदभरती प्रक्रियेला त्वरित सुरुवात होईल.</p>