नाशिक । Nashik
मराठा विद्या प्रसारक समाज संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय नाशिक, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, पुरस्कृत जनशिक्षण संस्थान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय कार्यशाळेत फळे व भाजीपाला यांपासून प्रक्रिया पदार्थ बनविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी पपया पासून जाम, पेरू पासून जेली, टोमॅटो पासून केचप व बटाटा आणि केळी पासून वेपर्स हे उपपदार्थ कसे बनवावे याचे प्रशिक्षण कृषी महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाच्या प्राध्यापिका डॉ.सुषमा लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले.
यादरम्यान विद्यार्थ्यांनी हे पदार्थ बनविण्यास लागणारे साहित्य, उपपदार्थ बनविण्याची कृती, पॅकेजिंग,साठवणुकीच्या पद्धती,त्यासाठी लागलेला खर्च, होणारा नफा व बाजारातील मागणी इत्यादी माहिती जाणून घेतली.
डॉ चव्हाण यांनी ‘ फळे व भाजीपाला हे नाशवंत असल्यामुळे खूप दिवस टिकू शकत नाहीत किंवा बाजारात वाढती आवक व कमी भाव यामुळे माल फेकून देण्यापेक्षा त्यांपासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविल्यास ते दीर्घकाळ टिकू शकतात ‘ असे सांगितले.
ज्योती लांडगे यांनी ‘ उपपदार्थ बनवून व त्यांपासून छोटे छोटे प्रक्रिया उद्योग उभारून महिला बचत गट, शेतकरी व तरुण पिढीला उद्योजक होण्यासाठी तसेच या उद्योगामध्ये लोकांना रोजगार निर्मिती करून कोविड-१९ सारख्या कठीण परिस्थितीत पैसे मिळवण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत व या संधीचा फायदा करून घेणे हि काळाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी जनशिक्षण संस्थान नाशिक संचालिका ज्योती लांडगे, कार्यक्रम अधिकारी प्रकाश नाठे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय.बी.चव्हाण उपस्थित होते.