नगर परिषद समावेशास ग्रामपंचायती नाखूश?

हद्दवाढीचा प्रस्ताव गंगाधरी ग्रामपंचायतीने नाकारला
नगर परिषद समावेशास ग्रामपंचायती नाखूश?

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

शहर विकासाच्या दृष्टीने नगर परिषदेच्या (nagar parishad) सर्वसाधारण सभेत शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव मंजूर सर्वांनुमते मंजूर करण्यात आला आहे.

मात्र, या हद्दवाढीत समाविष्ट होणार्‍या सहा ग्रामपंचायतीची (grampanchayat) भूमिका तळ्यात-मळ्यात दिसून येत असल्याने या हद्दवाढीबाबत ग्रामपंचायतीत काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता वाढली आहे. या निर्णयाने अस्तित्वच संपुष्टात येणार असल्याने हद्दवाढीत समाविष्ट होण्यास ग्रामपंचायती नाखूश असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, गंगाधरी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेत नांदगांव (nandgaon) नगर परिषदेमध्ये विलीनीकरणाच्या (Merger) प्रस्तावाला विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नांदगाव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आयत्या वेळेवरील विषयात शहराची हद्दवाढ करून शहरालगत असलेल्या 6 ग्रामपंचायतीचे विलीनीकरण करून घ्यावे, असा ठराव सभेपुढे ठेवण्यात येवून चर्चेअंती तो सर्वानुमते मंजूरही केला गेला. नगर परिषदेच्या शेवटच्या सभेत हद्दवाढीचा प्रस्ताव सत्तारूढ गटातर्फे मंजूर करण्यात आला असला तरी या ठरावामुळे समाविष्ट होणार्‍या गावातील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे दिसून येत आहे.

आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांनी देखील शहराच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने हद्दवाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरालगत असलेल्या मल्हारवाडी, गंगाधरी, गिरणानगर, क्रांतिनगर, फुलेनगर, श्रीरामनगर या सहा ग्रामपंचायतींना नगर परिषदेमध्ये विलिनीकरण होण्यासाठी ठराव करून द्यावे असे पत्र दिले आहे. रहिवाशांना रस्ते (road), पाणी (water), वीज यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत असतात.

त्यामुळे ग्रामपंचायतीचे विलिनीकरण होऊन नांदगांव शहराची हद्दवाढ झाल्यास ग्रामपंचायत हद्दीतील परिसराला शहराचा दर्जा मिळेल व सर्व नागरी सुविधा उपलब्ध होऊन रहिवाशांचे राहणीमान उंचावण्यास मदत होईल ही आग्रही भूमिका शहराच्या विकासाच्या दृष्टीने आ. कांदे यांनी या पत्रातून मांडली आहे. दरम्यान, हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींमध्ये मात्र वेगळाच सुर निघत असून गंगाधरी ग्रामपंचायतीने गावाची ग्रामसभा घेत हा विषय ग्रामसभेवर ठेवला असता ग्रामसभेत नगर

परिषदेत विलिनीकरण करण्यात येऊ नये, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. गंगाधरी हे गाव वाड्यावस्तीचे असून त्याचा विकास होणेकामी ग्रामपंचायतच राहणे गरजेचे असल्याचे सभेत ठरले आहे. दरम्यान, नांदगाव नगर परिषदेची शहर हद्दवाढ व विलिनीकरणाच्या मुद्यावरून उर्वरित पाचही ग्रामपंचायती ग्रामसभा घेऊन चर्चा करत ठराव मांडणार आहेत. त्यामुळे विलिनीकरणाच्या मुद्यावरून नांदगाव व शहरात सहभागी होण्यासाठी किती ग्रामपंचायती ठराव मंजूर करतात किंवा नाही हे पाहणे औचित्याचे ठरणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com