
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
गोखले शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात नवे युग निर्माण केले असून विकासाची दूरदृष्टी ठेवणारे डॉ. मो. स. गोसावी हे संस्थेच्या माध्यमातून समाजाचा विकास घडवत आहेत. संशोधनाला वाव शिक्षणातून देत आहेत,असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केले.
गोखले शिक्षण संस्थेचा (Gokhale Education Institute) १०५ वा वर्धापन दिन सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपास्थितीत रविवारी (दि.१९) अभियांत्रिकी महाविद्यालयात (Engineering College) झाला. त्यावेळी त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे महासंचालक व सचिव सर डॉ. मो. स. गोसावी (Dr. M. S. Gosavi) होते.
व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse), आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande), आमदार सीमा हिरे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. एस. बी. पंडित, संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर व प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, डॉ. सुहासिनी संत प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे, आस्थापना व्यवस्थापक शैलेश गोसावी, ब्रँच सेक्रेटरी, सह खजीनदार डॉ. आर. पी. देशपांडे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ डॉ. मीना चंदावरकर ह्यांना 'सर डॉ. मो. स. गोसावी एक्सलन्स अॅवार्ड ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, डॉ. मीना चंदावरकर (Dr. Meena Chandavarkar) सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या की, सकारात्मक विचार यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो. एक नकारात्मक विचार सर्व चांगल्या विचारांना नष्ट करतो.
संस्थेच्या शैक्षणिक (Educational) योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी गोखले शिक्षण संस्था ही अनेक विद्या शाखांची सुविधा उपलब्ध करून देऊन एखादया विद्यापीठाप्रमाणे कार्य करत आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री भुसे, आमदार फरांदे व आमदार हिरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून डॉ. गोसावी म्हणाले, आजच्या शिक्षणातून नामदार गोखल्यांचे विचार समाजात रुजवले पाहिजेत. कुठल्याही कामात सातत्य टिकवणे हे चांगल्या परिणामकारकतेसाठी आवश्यक आहे. शिक्षणातील एकता व पावित्र्यता ह्यातून मानवता निर्माण होते असे ते म्हणाले. संस्थेच्या भावी योजना त्यांनी ह्या प्रसंगी स्पष्ट केल्या. यावेळी आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी ह्यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मुग्धा जोशी व डॉ. स्नेहा रत्नपारखी ह्यांनी केले.