<p><strong>नाशिक । Nashik (प्रतिनिधी)</strong></p><p>हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अर्थात मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेसवे तयार करताना विविध वन्यप्राण्यांच्या मुक्त वावराचा विचार करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना नैसर्गिकरीत्या व निर्धोकपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वन क्षेत्रातून जाणार्या या महामार्गावर 295 ठिकाणी उन्नत, भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत.</p>.<p>आराखड्यात तसा बदल करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी भुयारी मार्ग व पुलाखाली ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. सध्या महामार्गाचे रस्ते, महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडकेने अनेकदा वन्यप्राणी जखमी होतात, प्रसंगी दगावतात. हे प्राणी रस्त्यावर येऊ नयेत म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जाळ्यांचे कुंपण घातले जाते. परंतु त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर रोखला जातो. समृद्धी महामार्ग सुमारे 700 किलोमीटरचा आहे. सहा तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचता येणार आहे. 14 जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असून त्यांपैकी 118 किलोमीटरचा पट्टा हा वनक्षेत्रातून जातो.</p><p>भारतीय वन्यजीव महामंडळाने क्षेत्रीय स्तरावर केलेल्या पाहणीनुसार या परिसरात नीलगाय, चिंकारा, भारतीय ससा, साळिंदर, रानडुक्कर, काळवीट यांसारखे शाकाहारी प्राणी, तसेच रानमांजर, बिबट्या, सोनेरी कोल्हा, भारतीय कोल्हा, भारतीय लांडगा, पट्टेवाला तरस, अस्वल यांसारख्या मांसाहारी प्राण्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. या वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या भागातून जाणार्या महामार्गावर त्यांचा मुक्तसंचार व्यत्ययविरहित राहावा.</p><p>तसेच निर्धोक व नैसर्गिकरीत्या त्यांना महामार्गाच्या या बाजूकडून त्या बाजूला सहजपणे जाता यावे, यासाठी 1797 संरचना करण्यात येत आहेत. त्यापैकी वनक्षेत्रातून जाणार्या महामार्गावर पाच मोठे पूल, 19 लहान पूल, 19 भुयारी मार्ग, सात उन्नत मार्ग यांसह आणखी लहान-मोठ्या अशा 295 संरचना करण्यात येणार आहेत.</p><p>महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने आणि हॉर्नच्या आवाजाने प्राणी बिथरतात. त्यामुळेही अपघात होण्याचा धोका असतो. त्याचाही विचार करून पुलाखाली व भुयारात ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यापुढे कोणत्याही भागात रस्ता, महामार्ग किंवा पूल बांधायचा झाल्यास आणि आजूबाजूला जंगल असेल, तर सर्वांत आधी वन्यजीवांच्या येण्या-जाण्याचा मार्ग सुरक्षित करण्यावर प्राधान्य देण्यात येत आहे.</p>.<p><em><strong>घनवनही तयार करणार </strong>आता जुन्या वृक्षांना संरक्षण मिळणार असून, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ते ङ्गहेरिटेजफ म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. तसेच कमी वेळेत ङ्गघनवनफ तयार करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राज्यात 75 विशेष ङ्गरोपवाटिकांफची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून, शासकीय रोपवाटिकेच्या माध्यमातून ङ्गसह्याद्री देवराईफ संस्थेच्या मदतीने स्वदेशी प्रजातींच्या झाडांच्या लागवड आणि संवर्धनाला चालनाही देण्यात येणार आहे.</em></p>