नाशिक । Nashik
करोनाची रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथील करण्यात आले असून आजपासून (दि.७) सर्व दुकाने दिलेल्या वेळोमर्यादेत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
मात्र, ही सूट म्हणजे धोका टळला नसून नाशिककरांनी अटीशर्तीचे पालन करावे अन्यथा तिसर्या लाटेला समोरे जावे लागेल. अटीशर्ती या निर्बंध नसून करोनापासून सुरक्षेची ढाल असून त्याचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
नाशिक जिल्हयाचा तिसर्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून सोमवारपासून (दि.७) सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आजपासून पुन्हा सर्व व्यवहार पूर्ववत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मांढरे यांनी रविवारी (दि.६) चित्रफितीद्वारे नाशिककरांना नियम पाळण्याचे आवाहन केले.
मागील फेब्रुवारी महिन्यात जिल्हयात एक हजार अॅक्टिव्ह रुग्ण होते. त्यामुळे सर्वकाही अनलाॅक करण्यात आले. तज्ज्ञ दुसर्या लाटेचा धोका वर्तवत असताना आपण सर्व बेफिकरीने वागलो. सर्व सुरु करताना नियम व अटीशर्तीचे पालन करण्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी दुसरी लाट धडकली. एक हजार अॅक्टिव्ह रुग्णसंख्या एक महिन्यात ४० हजारांवर पोहचली.
या लाटेमुळे पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावावा लागला. मोठ्या प्रयत्नानंतर ही लाट अोसरली असली तरी अद्याप धोका टळला नाही. सद्यस्थितीत ७ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. रोज करोनाने मृत्यू होणार्यांचे प्रमाण वाढत आहे. ते बघता आजपासून अनलाॅक केले असले तरी नाशिककरांनी दिलेल्या अटीशर्तीचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.