निफाड | Niphad
साडे तीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा आणि हिंदू व मराठी सणामधील पहिला महत्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा (Gudhipadva) होय. या दिवशी नवीन वस्त्र, साखरेच्या पाकात बनवलेली माळ, लिंबाची डहाळी यांची गुढी उभारली जाते. त्यामुळे सर्वत्र उत्साहात गुढीपाडव्याचा सण (Festival) साजरा होत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे...
तर दुसरीकडे आठवडाभरापासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपले असून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) चिंताग्रस्त झाला असून निफाड तालुक्यातील नैताळे येथील एका शेतकऱ्याने चक्क कांदा, लसूण व द्राक्षाची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय साठे (Sanjay Sathe) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी याआधी बराक ओबामा यांची भेट घेऊन शेतीविषयक चर्चा केली आहे. तसेच तीन ते चार वर्षांपूर्वी साठे यांनी कांदे विकून मिळालेल्या अल्प रकमेची बिल्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मनीऑर्डर पाठवून तर कधी टोपी उपरणे पाठवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर लसूण, कांदा व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे निफाड तालुक्यातील द्राक्षे,गहु, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे (Damage) अद्याप पंचनामे झालेले नसून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.