वाहनधारकांनो ! घाबरू नका 'या' तारखेपर्यंत परवाना काढता येणार..
नाशिक | Nashik
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वाहन चालक परवाना, वाहन परवानगीची व नूतनीकरणाची मुदत आता वाढविली आहे.
याआधी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत हाेती. याबाबत मंत्रालयाने नव्याने परिपत्रक काढले असून नाहक वाहनधारकांचा छळ करू नका, अशीही तंबी सर्व राज्यांना व संबंधितांना दिली आहे.करोनामुळे केलेल्या लॉकडाउनच्या काळात देशाच्या सर्व भागांतील प्रादेशिक परिवहन कार्यालये मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून जूनपर्यंत बंद होती. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने परवानगी दिल्यावर ‘आरटीओ' कार्यालये टप्प्याटप्प्याने सुरू झाली.
ज्यांचा वाहन परवाना, सर्व प्रकारच्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट, परवानगी आदींची मुदत १ फेब्रुवारीनंतर संपली असेल, अशांची मुदत केंद्र सरकारने यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत वाढविली होती. मात्र दरम्यानच्या काळातही आरटीओ कार्यालये पुरेशा क्षमतेने सुरू होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने २४ ऑगस्ट रोजी पुन्हा आदेश काढून ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे.
दरम्यान, कराेनाच्या कठीण काळात कार्यरत नागरिक, वाहतूकदार, इतर अनेक संस्थांना नाहक त्रास देऊ नये, या आदेशाची अंमलबजावणी करा, असे निर्देश मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत.