सातपूर । Satpur प्रतिनिधी
औद्योगिक वसाहतींवर अवलंबून असलेले जनजीवन करोना संसर्गामुळे बंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यातही गेल्या 3-4 महिन्यांमध्ये लॉकडाऊनच्या अडचणीत वीजमंडळाने नागरिकांना अवाजवी वीजबिल पाठवत मोठा झटका दिला आहे.
ही लादलेली वाढीव वीजबिले रद्द करण्यात यावी आणि सरासरी प्रमाणे वीजबिले द्यावीत, अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरेे यांना करण्यात आली.
त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीचा महत्वाचा दुवा असलेले रिक्षाचालक यांना लॉकडाऊनमुळे आर्थिक उत्पन्न नाही. त्यांचाही विचार करून त्यांना 5 हजार रुपये आर्थिक सहाय्य्य द्यावे. कष्टकर्यांना वीज बिलामुळे पडणारा भुर्दंड तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी अमोल दिनकर पाटील यांनी खा. हेमंत गोडसे व नगरसेवक तथा माजी सभागृहनेता दिनकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थित नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिले. याप्रसंगी नगरसेवक रवींद्र धिवरे व अनिल भालेराव उपस्थित होते.
काही नागरिकांकडे एसी, फ्रिज अशा सुखवस्तू नाहीत. त्यांना चक्क दहा हजार रुपयांपर्यंतचे भरमसाठ वीजबिले पाठवण्यात आलेली आहे. एक प्रकारे ही कष्टकरी जनतेची आर्थिक लूट असून त्याचे गंभीर दुष्परिणाम होतील. त्याची जबाबदारी प्रशासन व वीज वितरण कंपनीवर राहणार आहे.
त्यामुळे ही लादलेली वाढीव वीजबिले तातडीने रद्द करण्यात यावी आणि सरासरीप्रमाणे वीजबिले द्यावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.