नाशिक । Nashik
माझं कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सध्या राज्यभर सुरू असून नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत या अभियानातून जवळपास ४० टक्के नागरिकांची तपासणी झाली आहे.
या अभियानातून आतापर्यंत संदर्भीत केलेल्या रुग्णांपैकी ११४५ रुग्ण करोना बाधीत आढळले आहेत. आरोग्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या अभियानातून चार लाख ५९ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ८ लाख ५० हजार रुग्णांची ॲपमध्ये नोंद करण्यात आली आहेत.
या सर्वेक्षणात नाशिक जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात करोनाचा प्रकोप झाला असून देशातील सर्वाधिक करोनाबाधीतांची संख्या महाराष्ट्रात आहे.
या कोरोना संसर्गाला आटकाव घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ सप्टेंबरपासून राज्यात माझं कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान सुरू केले आहे. यामध्ये आरोग्य सेवक व स्वयंसेवक असे तीन जणांचे रोज पन्नास कुटुंबांना भेट देऊन तेथील नागरिकांची आरोग्याशी संबंधीत माहिती घेऊन ती ॲपमध्ये भरली जाते.
यामध्ये कुटुंबातील प्रत्येस सदस्याचे तपमान मोजणे, ऑक्सीजन प्रमाण तपासणे यासह भूतकाळातील काही आजार असतील तर त्याचीही माहिती घेतली जाते. या पथकाला नागरिकांमध्ये आरोग्याबाबत काही समस्या आढळली तर त्यांना ग्रामीण अथवा जिल्हा रुग्णालयाकडे संदर्भित केले जाते.
या पथकांनी चार लाख ५९ हजार ३१२ घरांना भेटी देऊन २१४४५८३ नागरिकांची तपासणी केली आहे. यामध्ये पथकांना सारी या आजाराचे ८०७ रुग्ण आढळले असून त्यांनी संदर्भित केलेल्या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी ११४५ जण करोनाबाधीत आढळून आले आहेत.
पहिल्या क्रमांकाच्या जिल्ह्यात कारवाई
माझं कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबवण्यात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भाग राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. हे अभियान राबवण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे हे समन्वयक आहेत. त्या समन्वयक अधिकाऱ्याविरोधातच जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आता तो गुन्हा मागे घेतला असला तरी अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच कार्यवाही झाल्याने तो राज्यभर चर्चेचा विषय झाला होता.