नाशिक । प्रतिनिधी
तापमानाचा पारा वाढत असून ग्रामीण भागात उन्हाची दाहकता वाढल्याने पाणी टंचाईचे झळा जाणवायला लागल्या आहेत. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या येवल्या तालुक्यासाठी तीन टॅकरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई शाखेला प्राप्त झाला आहे. मात्र टॅकर मंजुरीचे सर्व अधिकार हे प्रांताना दिले आहेत.
मागील दोन वर्षापासून जिल्ह्यात वरुणराजाने समाधानकारक हजेरी लावल्याने नेहमीच्या तुलनेत दुष्काळाची दाहकता कमी आहे. सन 2018 मध्ये तीव्र दुष्काळामुळवे जानेवारी महिन्यापासूनच ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने टॅकर सुरु झाले होते. त्यावेळेस जून महिना उजडेपर्यंत टॅकरची संख्या 400 च्या घरात गेली होती. त्यानंतर मात्र 2019 व 2020 या वर्षी वरुणराजाने जिल्ह्यावर कृपादृष्टी केली. त्यामुळे दुष्काळाच्या झळांची तीव्रता कमी प्रमाणात जाणवत आहे.
यंदा एप्रिलचा पंधरवडा उजडला तरी जिल्हा अद्याप एकही टॅकर सुरु नाही ही करोना संकटात जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.
दुष्काळी तालुका असलेल्या येवल्यात काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. येवल्यासाठी तीन टॅकरचा प्रस्ताव टंचाई शाखेकडे प्राप्त झाला आहे. पण पाणी टंचाई असलेल्या दुष्काळी गावांसाठी टॅकर मंजुरीचे अधिकार हे प्रातांना देण्यात आले आहे.
टंचाई शाखेकडून टॅकरचा सुरु करण्याचा प्रस्ताव येवला प्रातांना पाठविण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील धरणांत 50 टक्क्याहून अधिक जलसाठा आहे. त्यामुळे योग्य नियोजन करुन काटकसरीने पाण्याचा वापर केल्यास पुढील दीड महिना जिल्ह्याची तहान सहज भागवली जाऊ शकते.