स्वा. सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी
दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp
भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar)समूहाच्या वतीने स्वा. सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात (the port of Marseilles) जहाजेतून मारलेल्या साहसी उडीला 112 वर्षे झाल्याबद्दल, भारत सरकारने भगूरपुत्र सावरकरांना भारतरत्न ( Bharatratna)किताब देण्यासाठी जयघोष करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छ.शिवाजी महाराज व स्वा.सावरकर यांच्या पुतळ्यास अनुक्रमे श्रीराम कातकाडे व गणेश महाराज करंजकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच सावरकर स्मारकात अनुक्रमे कैलास भोर व प्रसाद आडके, नीलेश हासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलतांना गणेश महाराज करंजकर यांनी सांगितले की, भारतरत्न देण्याची मागणी खूप जुनी आहे.
देशाच्या अनेक भागातून मागणी झालेली आहे. परंतु आता या मागणीची पुनश्च सुरुवात, सावरकर नावाची क्रांतीची ज्योत जेथे पेटली, तसे भारतरत्न देण्याच्या मागणीची ज्योतसुद्धा आता आम्ही स्वा. सावरकरांच्या जन्म ठिकाण भगूर येथून पेटवत आहोत. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी ज्या व्यक्तींनी आपले आयुष्य वेचले आहे, खर्ची घातले आहे त्यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाची आहुती या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात दिली त्या स्वातंत्र्यवीरांना 75 वर्षानंतर देखील अजूनही दुर्लक्षितच ठेवण्यात आले आहे. अजूनही तात्यारावांना भारतरत्न जाहीर करण्यात येत नाही ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना चीड आणणारी गोष्ट ठरत आहे. त्यामुळेच आणि आज स्वातंत्र्यवीरांनी अथांग समुद्रात मारलेल्या जगप्रसिद्ध उडीस 112 वर्षे पूर्ण होत असल्याने सर्व सावरकर भक्तांनी एक प्रचंड हुंकार भरलेला आहे. स्वातंत्र्यवीरांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे.
यावेळी मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, संभाजी देशमुख,काकासाहेब देशमुख, आशिष वाघ, मृत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड, संदेश बुरके, भूषण कापसे, विजय घोडेकर, सुनिल जोरे, श्रुती करंजकर आदी उपस्थित होते.