
नाशिक । प्रतिनिधी Nashik
उत्तर महाराष्ट्रातील भाविकांसाठी मनमाड ते पंढरपूर रेल्वेगाडी सुरु करण्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना पत्र पाठवून ही रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी विनंती केली आहे. ही रेल्वेगाडी सुरू झाल्यास जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून परवड थांबणार आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील वारकर्यांचे श्रद्धास्थान आहे. पंढरपुराला मराठी संस्कृती घडविणार्या थोर भागवतधर्मीय संतांनी नावारूपास आणलेले महाराष्ट्राचे पवित्र तीर्थक्षेत्र असून मनमाड मार्गे उत्तर महाराष्ट्रसह परिसरातील येवला, नांदगांव, मालेगांव, सटाणा, देवळा, साक्री, धुळे, चाळीसगांव, पिंपळनेर, चांदवड तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे जात असतात. या भागातील भाविकांना पंढरपूर येथे जाण्यासाठी थेट कुठलीही रेल्वेगाडी नाही. यामुळे भाविकांसाठी ही गाडी अत्यंत गरजेची असून तत्काळ रेल्वेगाडी सुरू करण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.
या रेल्वेगाडीमुळे पंढरपूर येथे जाण्यासाठी भाविकांना मनमाडहून सायंकाळी निघून सकाळी पंढरपूर येथे पोहचेल, अशा प्रकारची पॅसेंजर रेल्वेसेवा दररोज सुरु केल्यास या भागातील भाविकांची व वारकरी उपासकांची जाण्या-येण्याची सोय होईल. तरी प्रवाशांच्या सोईसाठी मनमाड ते पंढरपूर रेल्वेसेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री भुसे यांनी केली आहे.