पुनदखोरे । Punadkhore (वार्ताहर)
कळवण तालुक्यासह शहरात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतच असुन रुग्णांसाठी कोविड सेंटरमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांची नाहक हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कळवण तालुक्यातील अभोणा ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर असुन तेथे फक्त 28 खाटा उपलब्ध आहे. कळवण येथील मानुर कोविड सेंटरमध्ये अवघे 32 खाटा उपलब्ध असल्याने तालुक्यासह शहरात कोविड सेंटर वाढवून खाटा ची संख्या वाढविण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.
कळवण तालुक्यातील अभोणा व शहरात मानुऱ येथे आदीवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय वस्तीगृहात कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहे. सुरुवातीला या कोविड सेंटरमध्ये रुग्ण संख्या कमी असतांना ज्या सुविधा देण्यात आल्या होत्या त्या प्रमाणे आजमितीस तालुक्यात 403 रुग्ण अॅक्टीव्ह आहे.
शहरामध्ये 178 रुग्ण अॅक्टीव्ह आहे. त्यांच्या सुविधांची कमतरता निर्माण झाली असल्याने रुग्णांची नियमित तपासणी नाही. तपासणी झालीच तर वैद्यकीय अधिकारी स्वतः तपासणीसाठी न जाता इतरत्र कर्मचार्यांना तपासणीसाठी पाठवतात. तालुक्यात रुग्णांसाठी फक्त दोनच कोविड सेंटर असल्याने रुग्णांना खाटा उपलब्ध होत नसल्याने गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांना नाशिक येथे पाठविण्यात येत आहे.
दुसर्या टप्प्यात 838 रुग्ण बाधित झाले आहे. आजपर्यत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे कोविड सेंटरमध्ये अस्वच्छता, दुषीत पिण्याचे पाणी, दुर्गधी व साफसफाई नसलेले स्वच्छतागृह तसेच रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत कोविड सेंटरवर एकही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी नसल्याने रुग्णांना कोणीही वाली राहत नसुन रुग्ण बेवारस पडत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
त्याचप्रमाणे रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर ते बरे झाल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगोटीव्ह आलेत का नाही याची कल्पना न देता त्यांना तीन ते चार दिवसात सोडून देण्यात येते. त्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशा विविध समस्या या ठीकाणी असुन याबाबत बरे झालेले व घरवापसी करणारे रुग्णांची माहीती देत आहे.
यात कोणाचे हित साध्य होत आहे ? हे गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, नगरपंचायत प्रशासनाने कळवण शहरातील प्रत्येक व्यापार्यास करोना चाचणी करण्याचा मागील आठवड्यात फतवा काढला होता. त्या आधारे जवळजवळ सगळ्याच व्यापार्यांनी करोना चाचणी करून घेतली. त्यात काही नागरीक पॉझिटीव्ह आले तर काही निगेटीव्ह, पॉझिटीव्ह रुग्णांचे म्हणने आहे की, आम्हास कोणत्याही प्रकारचा त्रास कींवा लक्षणे नसुन सुद्धा आमचा रिपोर्ट पॉझिटीव्ह कसा आला? कोविड सेंटर मध्ये धातूरमातूर उपचार करून तीन ते चार दिवसांत आम्हास सोडून देण्यात आले.
खरोखरच आम्ही पॉझीटीव्ह होतो का ? अशी शंका निर्माण होत आहे. यात काय गौडबंगाल आहे असा प्रश्न उपस्थीत राहत आहे. तालुक्याच्या लोकप्रतीनिधींनी या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देऊन तालुक्यात कोविड सेंटरसह खाटा वाढविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.