
त्र्यंंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर( Nashik- Trimbakeshwar Road) दिंडीमार्ग, वारकरी ट्रॅक करावा(Warkari Track ), अशी मागणी वारकरी भाविकांनी केली आहे. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज यात्रा तोंडावर आली असताना वरील जुन्या मागणीची वारकर्यांनी आता पुन्हा आठवण करून दिली आहे.
संत निवृत्तिनाथ दिंडी मार्ग म्हणून हा मार्ग असावा यासाठी गत कुंभमेळ्यापूर्वी नाशिक-त्र्यंबक रस्ता चौपदरीकरण करण्यात आले. मार्गावर झाडे लावण्यात आली. या रस्त्यावर सायकल ट्रॅक आणि वारकरी दिंडीसाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचे नियोजन असे संकल्प चित्र तेव्हा कार्यक्रमाच्या उद्घाटन पत्रिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखवले होते.
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या काळात हा रस्ता चौपदरीकरण झाल्याने आज लक्षावधी भाविक त्र्यंबकला दर्शनासाठी सहज ये-जा करू
लागले आहेत .पुढे सात वर्षे या मागणीकडे सुरुवातीला भाजप- शिवसेना नंतर महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केले. कदाचित महाविकास आघाडी सरकारने दिंडी मार्ग केला असता तर आता वारकर्यांना हा मार्ग सुकर झाला असता. मधल्या काळात दोन वर्षे कोविड असल्याने यात्रा भरली नाही. त्यामुळे दिंडी मार्गाचा विसर सर्वांनाच पडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर वारकरी ट्रॅक रस्त्याच्या दुतर्फा दिंडी मार्ग करून पुण्य संपादन करावे. संत निवृत्तिनाथांचे आणि वारकरी भाविकांचे आशीर्वाद मिळवावे, अशी मागणी समस्त वारकरी आणि दिंडीचालक-मालक करत आहेत. नाशिक-त्र्यंबक मार्गावर वर्षभर साईबाबांच्या दिंड्या संत निवृत्तिनाथ यात्रेसाठी, वारीसाठी येत असतात. तसेच त्र्यंबकेश्वर ते प्रयागतीर्थ हा मार्ग प्रदक्षिणा आहे. हे सर्व लक्षात घेता नाशिक-त्र्यंबक मार्ग दिंडी मार्ग करावा, ही मागणी आहे.