नाशिक | प्रतिनिधी
दिल्ली-मुंबई कॉरिडॉर यापूर्वी पाणी उपलब्ध नसल्याने प्रकल्प स्थगित करण्यात आला होता. जलसंपदा विभागाच्या प्रशासनाने प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्पातून कॉरिडाँरसाठी पाणी आरक्षित ठेवावे यासाठी खासदार हेंमत गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले...
नव्याने प्रस्तावित असलेल्या अप्पर-वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याला अधिकचे पाणी उपलब्ध होणार असल्याचे पत्र जलसंपदा विभागाने महाराष्ट्र ओैद्योगिक विकास महामंडळाला दिले आहे.
या नदीजोड प्रकल्पाच्या पाण्यातून २.६ टीएमसी पाणी मुंबई-दिल्ली कॉरिडाँर प्रकल्पासाठी आरक्षित केल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे. दिल्ली-मुंबई कॉरिडाँरसाठी पाणी आरक्षित केल्याने हा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार आहे.
राज्यातील औरंगाबाद आणि नाशिक येथे दिल्ली-मुंबई कॉरिडाँर करण्याचा निर्णय गेल्या चार वर्षापूर्वी तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई कॉरिडाँरचे काम पुर्णत्वाच्या दिशेने आहे.
मात्र प्रकल्पासाठी लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने नाशिक जिल्ह्यात दिल्ली-मुंबई कॉरिडाँर प्रकल्प होवू शकला नाही. पाण्याअभावी हा प्रकल्प स्थगित करण्यात आला होता. दिल्ली-मुंबई कॉरिडाँरमुळे नाशिक जिल्ह्याचा विकास होणार असल्याने खा. गोडसे यांनी प्रकल्पासाठी पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न सुरु केले होते. दरम्यान प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्प या प्रकल्पातून दिल्ली-मुंबई कॉरिडाँर २.६ टीएमसी पाणी आरक्षित करावे, यासाठी खा. गोडसे यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा केला होता.
दिल्ली-मुंबई कॉरिडाँर पाणी आरक्षित असावे यासाठी नुकतीच खा. गोडसे यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात विशेष बैठक बोलविली होती. या बैठकीत खा. गोडसे यांनी नाशिक जिल्ह्यांच्या विकासासाठी दिल्ली-मुंबई कॉरिडाँरचे महत्त्व आणि त्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेची गरज याविषयीचे महत्त्व पटवून दिले होते.
खा. गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने दिल्ली-मुंबई कॉरिडोअर प्रकल्पासाठी प्रस्तावित अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक नदीजोड प्रकल्प या प्रकल्पातून २.६ टीएमसी पाणी आरक्षित करण्याचे जलसंपदा विभाग प्रशासनाने मान्य केले आहे.
याविषयीचे पत्र जलसंपदा विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाला नुकतेच दिले आहे. दिल्ली-मुंबई कॉरिडोअर पाणी आरक्षित झाल्याने हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.