नांदूरमध्यमेश्वर कालव्यांच्या वहन क्षमतेत घट

धरणासह पाटांची शंभरी; दुरुस्तीसाठी प्रयत्नांची गरज
नांदूरमध्यमेश्वर कालव्यांच्या वहन क्षमतेत घट

निफाड। प्रतिनिधी Niphad

स्वातंत्र्यपूर्व काळात तयार करण्यात आलेले कालवे Canals अतिशय जीर्ण होत त्यात काटेरी झुडपे, पानवेलींनी बस्तान बसविल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांच्या Nandurmadhyameshwar dam canals वहन क्षमतेत मोठी घट झाली असून पाटबंधारे विभागाने या कालव्यांचे नूतनीकरण करावे अशी मागणी होत आहे.

इंग्रजांनी नांदूरमध्यमेश्वर येथे गोदावरी, कादवा, दारणा नद्यांच्या संगमावर सन 1889 मध्ये 1 कि.मी. लांबीच्या धरण बांधकामास मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. दगड, चुना व माती याचा वापर करून हे धरण 1905 साली पूर्ण करण्यात आले. त्यावेळी धरणाची पाणी साठवण क्षमता होती 1050 दशलक्ष घनफूट तर आता धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता अवघी 250 दशलक्ष घनफूटावर आली आहे.

धरण बांधल्यानंतर धरणाच्या दोन्ही बाजूने म्हणजेच उजवा व डाव्या कालव्यांच्या खोदकामास सुरुवात करून उजवा कालव्याची वहन क्षमता त्यावेळी 550 क्यूसेक करून त्याची लांबी 119 कि.मी. तर डावा कालवा 300 क्यूसेक चा करून तो 90 कि.मी. लांबीचा करून या दोन्ही कालव्यांचे काम 1915 पर्यंत पूर्ण करण्यात येऊन 1916 साली प्रथमच या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात आले.

या कालव्यांमुळे निफाड, येवला, सिन्नर, कोपरगाव,राहता तालुक्यातील शेती बहरली. तसेच प्रमुख शहरांसह साखर कारखाने, औद्योगिक वसाहती यांना देखील या पाण्याचा मोठा उपयोग झाला. कालव्यांमुळे हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. मात्र आता 100 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटल्याने हे कालवे जीर्ण झाले आहेत. पाटबंधारे विभागाने फक्त तिथे पूल पडले, मोर्‍या तुटल्या त्यांचीच डागडूजी केली. परिणामी या कालव्याच्या कडेचा भरावा ढासळून व कालव्यात बोरीबाभळींसह पानवेली उगवल्याने या दोन्ही कालव्यांची पाणी वहन क्षमता निम्म्याने घटली आहे.

आजही कालवा बंद असला तरी देखील कालवा निम्म्या स्थिती पर्यंत भरलेला आढळतो. म्हणजेच कालव्यात असणारे दगड, गोटे, चढ-उतार यामुळे कालव्यात पाणी साचून राहते. अनेक ठिकाणी या दोन्ही कालव्यांचे भराव कमकुवत झाले आहेत. त्यामुळे ते केव्हाही आणि कुठेही फुटू शकतात. यापूर्वी देखील अनेकवेळा हे कालवे फुटले आहेत. मात्र वरवरची डागडूजी करून वेळ मारून नेली जात आहे.

साहजिकच कालव्यांची वहन क्षमता वाढावी यासाठी या दोन्ही कालव्यांचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. तसेच याच कालव्यांच्या चार्‍या व पोटचार्‍या देखील नामशेष झाल्या असून त्यांचेही नूतनीकरण होऊन कालव्यातील पाण्याचा लाभ संबंधित शेतकर्‍यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याच कालव्यावर जलसिंचन संस्थाही कार्यरत होत्या. मात्र वाढते वीजबिल आणि थकीत पाणीपट्टी यामुळे या संस्था नामशेष झाल्या आहे. भविष्यात पाणीटंचाईचे महत्व ओळखून या संस्थाही कार्यान्वित होण्यासाठी पाटबंधारे विभाग व शेतकर्‍यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com