
नाशिक | Nashik
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज एकदिवसीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कळवण (Kalwan) येथे शेतकरी कृतज्ञता मेळावा पार पडला. या कार्यक्रमामध्ये बोलतांना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सप्तशृंगी देवी संस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात महत्वाची घोषणा केली...
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सप्तशृंगी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत (Saptashrungi Devi Shrine Development Plan) एक बैठक होणार असून या बैठकीत सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ८१ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. तसेच बचत गट आणि अंगणवाडी सेविका यांच्याबाबत देखील सरकार मोठा निर्णय घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, श्रद्धा, निष्ठा ठेवून काम केले पाहिजे, मोठा भक्तगण सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतो. त्यामुळे गडावर अनेक प्रकारच्या सोयीसुविधा करणे आवश्यक आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मला आठवते की लोकांना चालत जावं लागायचे, भाविकांना त्रास व्हायचा, आता रस्ते रुंद झालेले आहेत, वर जाण्याकरता सोय झालेली आहे. ज्या काही सुविधा देता येतील, त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज देखील मी तिथे जात असताना माझ्याबरोबर सगळे मान्यवर होते. मी तोच विचार करत होतो की, अजून उद्याच्याला भाविकांना तिथे काय केले पाहिजे? काय केल्यानंतर भाविकांना अधिक सोयीचे होणार आहे. दर्शन घ्यायला त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) यांनी सांगितले की, गडावर काय काय सुविधा करता येतील, यासाठी आम्ही प्लॅन तयार केलेला आहे. त्या प्लॅनला देखील तुम्ही मंजुरी दिली पाहिजे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी बैठक लावण्यात आली असून या बैठकीत आराखड्याला मंजुरी दिली जाईल, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, मी देखील एक शेतकरी आहे. माझ्या वाटणीला वडिलोपार्जित जी जमीन आली आहे ती मी बारामतीत करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. महायुतीच्या काळात आम्ही अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत. मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा खाजगी सावकारी होती. परस्पर नावावर जमिनी करून घेतल्या होत्या. जिल्हा बँकेच्या बाबत चांगले निर्णय घेत असून टप्प्याटप्प्याने अडचणी सोडवू, असे अजित पवारांनी यावेळी म्हटले.
तसेच कधीकाळी नाशिक जिल्हा बँक (Nashik District Bank) एक नंबर बँक होती. परंतु, आता ही बँक अडचणीत आली आहे. ही बँक कुणामुळे अडचणीत आली त्याच्या खोलात मी जात नाही. मी सगळ्या आमदारांना बोलावून सांगितले ही बँक आपल्याला अडचणीतून बाहेर काढायची आहे. राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला पाहिजे. नाबार्डने पण पुढाकार घेतला पाहिजे. अडचणीत असलेली बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. ती बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. सहकार खातं आपल्याकडे आहे. वसुली सुरू झाली की म्हणू नका दादा हे सुरू झालं आणि ते सुरू झालं, बाकी काळजी करू नका, कुणाचे नुकसान होणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या (Nashik) जनतेला आश्वस्त केले.