<p><strong>नाशिक । Nashik (प्रतिनिधी)</strong></p><p>अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्याला मोठा तडाखा दिला असून ८६ गावातील ५ हजार ७०२ हेक्टरवरील पिके व फळबागा आडव्या झाल्या आहेत.</p>.<p>तर, वीज पडून निफाडमध्ये एकाचा मृत्यू झाला असून पशूधनाचेही मोठे नूकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने युध्दपातळीवर प्राथमिक पंचनामे पूर्ण केले असून नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवला आहे.</p>.<p>करोनामुळे अगोदरच शेतकरी संकटात आला असताना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका देखील सहन करावा लागत आहे. मागील एक आठवडयापासून राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून सोबतीला अवकाळी पाऊस व गारपिट होत आहे. नाशिक जिल्ह्यातही अवकाळीचा फटका बसला आहे.</p>.<p>अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसामुळे गहू,मका, बाजरी, ज्वारी, हरबरा व भाजीपाल्याला फटका बसला असुन शेतकर्यांच्या हाता तोंडांशी आलेला घास हिरावला गेला आहे. एकूण ५ हजार ३७७ हेक्टवरील पिके आडवी झाली आहेत. तर वार्षिक व बहुवार्षिक फळपिकांनाही अवकाळीचा तडाखा बसला आहे.</p>.<p>पपई, आंबा, डाळिंब व द्राक्ष बागांचे नूकसान झाल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण पाच हजार ७०२ हेक्टरवरिल पिके व फळबागांना अवकाळीचा फटका सहन करावा लागला आहे.</p>.<p>सर्वाधिक नूकसान झालेल्या तालुक्यांमध्ये निफाड, दिंडोरी, सटाणा व मालेगावचा समावेश आहे. दरम्यान या आस्मानी संकटामुळे शेतकरी संकटात सापडला असून शासनाच्या मदतीकडे त्यांचे लक्ष लागून आहे.</p>