लासलगाव । वार्ताहर
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन शिथिल केल्याने बंद असलेल्या लासलगावसह जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्या सुरू झाल्या आहे परंतु नोंदणीकृत 500 वाहनातील कांद्याचे दररोज लिलाव केले जाणार असल्याने आपल्या वाहनाची नोंद करण्यासाठी शेतकर्यांनी बाजार समिती आवाराच्या प्रवेशद्वारावर मोठी गर्दी केली होती .
मोबाईल वरून बाजार समितीने दिलेल्या क्रमांकावर फोन करत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा असतानाही बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर शेतकर्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे आणि पोलिसांनी करोनाचा आपल्याला विसर पडला आहे का, असे विचारत शेतकर्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले
लासलगाव बाजार समितीत काल 620 वाहनांतून आलेल्या 12 हजार 847 क्विंटल कांद्याचा लिलाव झाला कमाल 1753 किमान 700 तर सर्वसाधारण 1420 रुपये बाजार भाव मिळाला
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी नियम आणि अटी घातल्याने पाचशे वाहनाची नोंदणी होत असल्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर शेता पडून असलेला कांदा विक्री न झाल्यास मोठे नुकसान होईल यासाठी वाहनांची मर्यादा एक हजार करावी अशी मागणी यावेळी चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी समीर देवडे यांनी केली