
मनमाड । प्रतिनिधी Manmad
काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय आज गुरुवार जनशताब्दी एक्सप्रेसच्या शेकडो प्रवाशांना मनमाड रेल्वे स्थानकावर आला. जालन्याहुन मुंबईकडे जात असताना एका डब्याची कपलिंग बेरिंग तुटली होती. गाडी सुरु झाल्यावर कपलिंग तुटून अर्धी गाडी पुढे निघून गेल्यावर वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर गाडी थांबाविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
जनशताब्दीचा कपलिंग तुटलेला डबा काढून त्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे दोन तास गाडीचा खोळंबा झाला होता त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. गाडी धावत असतांना जर कपलिंग तुटली असती तर मोठी दुर्घटना झाली असती मात्र सुदैवाने रेल्वे स्थानकावर कपलिंग तुटल्यामुळे पुढील अनर्थ टळून गाडीतील प्रवाशांचा जीव बचावला.
याबाबत रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12072 अप जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड रेल्वे स्थानकाच्या प्लॉट फार्म क्र. 5 वर आली. सुमारे 10 मिनटानंतर गाडी मुंबईकडे जाण्यास निघाली असता मधोमध असलेल्या डी-11 या आरक्षित डब्याची कपलिंग बेयारिंग तुटली त्यामुळे काही पुढचे डबे घेऊन गाडी काही अंतरावर गेली मात्र वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर गाडी थांबविण्यात आली.
यानंतर कपलिंग तुटलेला डबा काढून त्याच्या जागी दुसरा डबा जोडण्यात आल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. या घटनेमुळे तब्बल दोन तास गाडीचा रेल्वे स्थानकावर खोळंबा झाला होता. गाडी धावत असतांना जर कपलिंग तुटली असती तर मोठी दुर्घटना झाली असती मात्र सुदैवाने रेल्वे स्थानकावर कपलिंग तुटल्यामुळे पुढील अनर्थ टळत जीव वाचल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.