ठाणगाव । Thangaon (वार्ताहर)
सुरगाणा तालुक्यातील बांधण्यात आलेल्या वनराई बंधार्यांची पंचायत समितीच्या सभापती मनीषा महाले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
सुरगाणा तालुका निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे. तसेच पावसाचे माहेरघर सोंधले तर वावगे ठरणार नाही. पावसाळ्यात येथे मुबलक पाऊस पडत असून काहीही उपयोग होत नाही.
पावसाचे पाणी वाहूनच जात असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांना काही ठिकाणी पाणीटंचाई निर्माण होऊन वणवण करावी लागते. चढ-उतार आणि डोंगर दर्यांचा बहुतेक भाग असल्याने पावसाचे पाणी पडताक्षणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाते आहे.
त्र्यंबकेश्वर, पेठ, तसेच सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा डोईजड सोसाव्या लागत असल्याने जलपरिषदेने ’मिशन जलपरिषद 101 वनराई बंधारा मोहीम राबवली आहे.
यामुळे सुरगाणा तालुक्याने या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला असून वनराई बंधारे बांधण्यास मोठी सुरुवात केली आहे.
यात कहांडोळचोंड, बेडसे, दाभाडमाळ, भेनशेत, केळावण आदी ठिकाणातील कुंडाचा नाला, वाकी नदी, केळावण तसेच ग्रामपंचायत भवाडा, बार्हे ठाणगाव अंतर्गत ठिकठिकाणी या भागात मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
यावेळी सभापती मनीषा महाले, योगेश महाले, सरपंच लताबाई पडेर, संजय पडेर, ग्रामसेवक मनोहर धूम, आरोग्य सहाय्यक भड, भाऊराव लोखंडे, पोलीस पाटील विजय चौधरी, हंसराज पाडवी, यादव पाडवी, दत्तू बागुल, बाबुराव अलबाड, गोविंद शेवरे, महादू जाधव, सिताराम पडेर, राजाराम शेवरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.