
नाशिक | Nashik
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता ही सेवा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यावर्षी या अभियानात कचरामुक्त भारत याबाबत विविध उपक्रमांव्दारे जनजागृती करण्यात येणार असल्याची माहितीजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येते. तसेच २ ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील केंद्र शासनाने या अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम कचरामुक्त भारत ही आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावरती लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदी किनारे, सार्वजनिक ठिकाण या ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करावयाची आहे. तसेच सार्वजनिक शौचालय, कचराकुंडया, कचरा वाहतूक वाहन, आदी सर्व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातुन दुरुस्ती, रंगकाम, साफसफाई करण्याचे निर्देश आहेत.
त्यानुसार सर्व गटविकास अधिका-यांना लेखी सुचना देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हयाने मागील वर्षी या अभियानात उत्कृष्ट काम केले असून यावर्षीदेखील सर्व उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत.
केंद्रीय मंत्री साधणार ऑनलाईन संवाद
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी ते संवाद कार्यक्रमाद्वारे सरपंच, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी तसेच शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.