नाशिक | प्रतिनिधी | Nashik
रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीच्या (Rotary Club of Nashik Grape City) माध्यमातून गोदावरी (Godavari) नदीकाठी आनंदवल्ली (Anandavalli) परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे एक ते दीड टन कचरा गोळा करण्यात आला.
नाशिकचे व्हिसलमॅन चंद्रकिशोर पाटील (Chandrakishore Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. नदीच्या काठावर मद्यपींनी फेकलेल्या दारूच्या बाटल्या, विविध खाद्यपदार्थांचे रॅपर, गुटखा, तंबाखू, सिगारेटची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या असा सुमारे एक ते दीड टन कचरा जमा करण्यात आला.
या मोहिमेचे नेतृत्व रोटरी क्लब ऑफ नाशिक ग्रेप सिटीच्या उपाध्यक्षा विभा घावरे यांनी केले. यावेळी बिगर वैद्यकीय संचालक राजेंद्र पाटणकर, रोटेरियन अभय मुजुमदार, रेणू मुजुमदार, सलील राजे, प्रज्ञा पाटणकर, अलका सिंग, उदय सिंग, ॲनेट रोहन, माधुरी नहिरे, आरटीएन, मधुवंती शिधये, शेफाली अग्रवाल, संजीव कौशिक, राजन पिल्लई आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटेरियन सभासदांचा उत्साह पाहून चंदू पाटील यांनी समाधान व्यक्त केले असून समाजाच्या विविध घटकांनी अशा पद्धतीने सातत्याने पुढे येत राहिले तर नदीकाठाची स्वच्छता करणे सोपे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माती वाचवा (Save Soil) ही मोहीम हाती घेतलेले सद्गुरू जग्गी वासुदेव हे ११ जूनला नाशिककरांशी संवाद साधणार आहेत. देशदूत आणि मविप्र समाज संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देशदूततर्फे करण्यात आले आहे.