नाशिक । कुंदन राजपूत
करोना संकटात राज्य आर्थिक संकटात असताना दानशुरांनी पुढे येत मुख्यमंत्री सहायता निधीस भरघोस निधी देत मदत केली. नाशिककर देखील मदत करण्यास मागे नसल्याचे पहायला मिळते. शहर व जिल्ह्यातुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत विविध संस्था, कंपनी व व्यक्तिंनी ११ कोटी ४८ लाख ६० हजार रुपयांची मदत करुन 'संकट गंभीर नाशिककर खंबीर' हा संदेश दिला आहे.
करोना संकटाशी देशासह राज्य शासन दोन हात करत असून डाॅक्टर, परिचारिका, पोलिस हे करोना वाॅरियर्स म्हणून रात्रंदिवस झटत आहे. या संकटात अनेक संस्था व व व्यक्ती गोरगरिबांना दोन वेळचे जेवण व अन्नधान्य वाटप करत आहे. अन्नदान, रक्तदान, जीवनाश्यक वस्तुंचे वाटप याद्वारे करोना संकटात माणुसकी हाच धर्म असल्याचे प्रत्येकाने सिध्द केले. या संकटाशी दोन हात करताना उद्योग धंदे व व्यवसाय ठप्प असल्याने राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे.
त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दान शुरांना आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीची स्थापना केली. राज्यातील कार्पोरेट घराणे, लोकप्रतिनिधी, छोटो मोठे उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण संस्था, मंदिर ट्रस्ट यांच्याकडुन मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक मदतीचा अोघ सुरु झाला. नाशिककरांनिही मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहायता निधीला भरघोस आर्थिक मदत केली. आतापर्यंत नाशिककरांनी ११ कोटी ४८ लाख ६० हजार रुपये सहायता निधित जमा केले आहे.
त्यामध्ये सर्वाधिक मोठा हा यंशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा असून त्यांनी दहा कोटिंचा धनादेश हा जिल्हाधिकार्यांकडे सुपूर्द केला. तसेच अगदी लहान मुलांनी त्यांच्या खाऊचे पैसे जमा केले. तर काहिंनी वाढ दिवस साजरा न करता त्या पैशांचा धनादेश जिल्हाधिकार्यांकडे देत सहायता निधीला मदत केली. जो तो आपल्या परीने आर्थिक मदत करत असुन या निधीतुन राज्य सरकारचे हात आर्थिकदृष्टया बळकट होत आहे. या निधीतुन करोना पाॅझिटिव्ह रुग्णांना उपचाराच्या उत्तम सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहे.
सर्वाधिक मदत करणारे टाॅप फाईव्ह
१) मुक्त विद्यापीठ - १० कोटी
२) मायलाॅन कंपनी - ५० लाख
३) जिल्हाबॅक - २३ लाख
४) नाशिकरोड देवळाली बॅक - ५ लाख
५) श्री शंकराचार्य न्यास - ५ लाख