नाशिक । प्रतिनिधी
अभिनेता सुशांत राजपूत आत्महत्या चौकशी प्रकरण तपास सीबीआयकडे गेला हे बरं झालं. नाही तर मुंबई पोलीसांनी कितीही चांगलं काम केलं तरी ते कुणालातरी वाचवत आहेत, असाच आरोप झाला असता.
आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने सत्य लवकरच बाहेर येईल, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.२४) झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. काँग्रेसचे आमदार निधी वाटपावरुन नाराज असले तरी त्यांचा सोबत चर्चा करणार.तीन पक्षांचं सरकार असल्याने कोणीतरी नाराज होणारच. मात्र महाविकास आघाडिचे सरकार मजबूत असल्याचा दावा त्यांनी केला. काॅग्रेस अध्यक्ष कोणी व्हावे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.
अध्यक्ष कोणीही होवो पण काँग्रेस पक्ष मोठा झाला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात सर्व ठिकाणी ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक गल्ली बोळात जाऊन कोरोनाची चाचणी केल्यानं रुग्ण संख्येत वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढत असले तरी देशात नाशिकचा रिकव्हरी रेट चांगला असल्याचे ते म्हणाले.
पाणी अडवणे गरजेचे
गुजरातला वाहून जाणारं पाणी नाशिककडे वळवणं आवश्यक आहे. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वाहून जात आहे. आता हे पाणी अडवलं नाही तर पुढे हे शक्य होणार नाही, असा धोका त्यांनी व्यक्त केला.