नाशिक । प्रतिनिधी Nashik
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या ४१८ जागांची परीक्षा येत्या ६ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.
महाराष्ट्रात या परीक्षेसाठी मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्र आहेत.मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा केंद्रावर राज्यभरातून येणार्या परीक्षार्थींना वेळेत पोहचणे आणि पोहचल्यानंतर भोजन, निवास यासारख्या सुविधांची गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने या परीक्षेसाठी येणार्या परीक्षार्थींना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
या परीक्षा प्रामुख्याने मुंबई आणि नागपूर या ठिकाणी होणार आहेत. अशा परिस्थितीत परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष रेल्वे अथवा बसेसची व्यवस्था करण्यात यावी, जेणे करुन विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत. त्याच बरोबर त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था व्हावी अशी परीक्षार्थींची मागणी आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यात परिक्षेचा ताण यामुळे विद्यार्थ्यांना चांगली सुविधा पुरविण्यात येवून परिक्षा केंद्रावरच अथवा परिक्षा केंद्राच्या जवळपास विद्यार्थ्यांची सोय करण्यात अशी परीक्षार्थी व त्यांच्या पालकांची मागणी आहे.
जेईई मेनच्या अर्जात दुरूस्तीची संधी
जेईई मेन आणि यूपीएससीची एनडीए एनए या महत्त्वाच्या दोन्ही परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने एनटीएने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जेईई मेनच्या अर्जांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही परीक्षा केंद्रापर्यंत प्रवासाचा, निवासाचा आणि जेवणाचा प्रश्न कायम असल्याने विद्यार्थांना या परीक्षेसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागणार आहे.