देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp
केंद्र शासनाने कर्नाटक व आंध्रप्रदेशाला कांदा निर्यातीबाबत निर्णय घेतला.
त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनाही निर्यातीची परवानगी देऊन झालेला अन्याय दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रतन चावला यांनी केली आहे.
केंद्र शासनाच्या कांदा निर्यातीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील व विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांवर मोठा अन्याय झाला असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संदर्भात राज्यभर केंद्र शासनाच्या निर्णया विरोधात तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या संदर्भात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या माध्यमातून केंद्र शासनाचा निषेध करत चावला यांनी महाराष्ट्राच्या शेतकर्यांच्या बाबत होणारा दुजाभाव व त्या अनुषंगाने शेतकर्यांवर होणार्या अन्यायाच्या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करुन महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी खंबीरपणे उभी आहे.
याबाबत चावला यांनी पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नाशिक विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून लेखी स्वरुपाचे निवेदन सादर केले. यावेळी देवळाली कॅम्प शहर अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके, महिला अध्यक्षा सायरा शेख व जिल्हा नेते राजेंद्र जाधव उपस्थित होते.