नाशिक | प्रतिनिधी | Nashik
डोंगरे वसतीगृह (Dongre Vasatigruh) येथे आयोजित कृषी महोत्सवाला (Krushi Mahotsav) कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भेट दिली. जिल्हा कृषी महोत्सवातील कृषी विभाग, वन विभाग, शेतकी कंपन्या, प्रक्रिया उद्योग, शेती माल, भाजीपाला, खते, शेती औजारे, औषधे, बी-बियाणे, खाद्य पदार्थ, शेती उत्पादने अशा विविध 200 हून अधिक स्टॉल्सला भेट देवून त्यांनी स्टॉलधारकांशी संवाद साधला...
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकरी हा आपल्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध पिके घेत आहे, नव्या कृषी वाणांची निर्मितीदेखील करत आहे. आधुनिक शेतीस निश्चितच चालना मिळाली पाहिजे. आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितच आमुलाग्र बदल घडत आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे.
शेतमालास योग्य भाव, माल साठवणुकीस शीतगृह, शेतीमालाचे पॅकींग, प्रक्रिया उद्योग, निर्यातीकरण आदींच्या अभ्यासासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, राकेश वाणी, संजय सुर्यवंशी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.