नाशिक | Nashik
विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार ( Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप आणि शिंदे गट (BJP and Shinde Group) चांगलाच आक्रमक झाला आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज शहरात दोन्ही पक्षांकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. भाजपने शहरातील रविवार कारंजा आणि मुंबई नाका येथे तर शिंदे गटाने पक्षाच्या संपर्क कार्यालयासमोर आंदोलन (Agitation) केले.
यावेळी भाजप आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) म्हणाल्या की, हिंदवी स्वराज्य टिकवण्यात व वाढविण्यात छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे योगदान फार मोठे आहे. हिंदू धर्मासठी १४ दिवस अन्नवित अत्याचार व अवहेलना सहन केली. कोणताही आवाज न करता मृत्यूला कवटाळले त्या संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे नाही तर कोणाला म्हणायचे असे त्यांनी सांगितले.
तसेच पवार परिवाराचा हिंदुत्वावरील राग व मुस्लिम तुष्टीकरणामुळे अजित पवार छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर मानण्यास तयार नाही. हा धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान महाराष्ट्र (Maharashtra) सहन करणार नसून अजितदादांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे.
तर शिंदे गटाचे महानगरप्रमुख बंटी तिदमे (Bunty Tidme) म्हणाले की, अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजघटकांतून पुढे आली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असून यापूर्वी राज्यपाल व इतर नेत्यांनी जेव्हा आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील या घटनेचा, विधानाचा निषेध केला होता. म्हणूनच कोणताही नेता असो अशाप्रकारे भावना दुखावणार असतील तर निषेध होणारच असे त्यांनी सांगितले.