मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
आपण 50 थर लावून दहीहंडी (Dahi Handi) फोडल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ठाकरी शैलीत समाचार घेतला...
तुम्ही 50 थर नाही खोके लावून दहीहंडी फोडली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्रास खुर्चीवरून खाली खेचून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न तुम्ही पूर्ण केले मलाही तुम्ही खात आहात. पण त्या 40 गद्दारांना काहीच मिळत नाही, अशी घनघाती टीका ठाकरे यांनी केली. गद्दारांचे हे सरकार तात्पुरते असल्याने ते लवकरच कोसळेल असा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला.
शिवसंवाद यात्रेनिमित्त शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे मालेगावी आगमन झाले. संगमेश्वरातील दत्त मंदिर चौकात आयोजित सभेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंद मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे नाव न घेता सडकून टीका केली.
शिवसेनेने ओळख दिली समाजात सन्मान दिला उमेदवारी दिली, मी स्वतः रोडशो व सभा घेत प्रचार करत निवडून आणले इतकेच नव्हे चांगल्या खात्याचे मंत्रीपद देखील दिले. यांनी देखील मातोश्रीवर अन्नाची शपथ घेत शिवसेना सोडणार नसल्याचे सांगितले होते मात्र नंतर अमिषा पोटी यांनीच पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केल्याचा आरोप ठाकरे यांनी भुसे यांचे नाव न घेता केला.
जे पक्षाचे, पक्षप्रमुखांचे व शिवसैनिकांचे झाले नाही ते महाराष्ट्राचे काय होतील? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला. पक्ष बदलणे, विचारसरणी वेगळी ठेवणे लोकशाही देशात हे चालते.
याबद्दल दुमत नाही मात्र महाराष्ट्रात सध्या जे घाणेरडे राजकारण सुरू आहे त्याची चीड असल्याचे सांगत ठाकरे पुढे म्हणाले आम्ही क्रांतिकारक आहोत, उठाव केल्याचे बंडखोर सांगतात परंतु यांनी उठाव नाही गद्दारी बेईमानी, दडपण व 50 खोक्याच्या अमिषा पोटी केली आहे. यांच्यात जराशी हिंमत व लाज असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीस सामोरे जाऊन दाखवावे असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले.
दोन महिने उलटले तरी सरकार कुठे आहे हे दिसत नाही. एक सीएम एक सुपर सीएम खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेला अजून कळालेले नाही, अशी टीका करत ठाकरे पुढे म्हणाले राज्यावर अनेक संकटे घोंगावत आहे. शस्त्र सापडत आहेत.
मुंबईला धमक्या दिल्या जात आहेत. अतिवृष्टीने शेतमालाचे नुकसान झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, ओला दुष्काळ जाहीर केला जात नाही. जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. यांचे मंत्री मात्र चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज आहेत. त्यामुळे सरकार आहे कुठे? असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवसेना तोडण्याची व शिवसैनिकांमध्ये उभी फूट पाडण्याचे तसेच ठाकरे परिवारास एकटे पाडण्याचे कटकारस्थान बंडखोर गद्दारांतर्फे सुरू आहे. त्यांचा हा कट महाराष्ट्रातील जनतेने शिवसैनिकांनी उधळून लावत ठाकरे परिवारावर आपले प्रेम यापुढेही कायम ठेवावे असे भावनिक आवाहन देखील ठाकरे यांनी शेवटी बोलताना केले.
या सभेत जयंत दिंडे, गजेंद्र चव्हाण, लालचंद सोनवणे, प्रमोद शुक्ला, श्रीरामा मिस्तरी, प्रवीण देसले, जितेंद्र देसले आदींची भाषणे झाली. विराट जनसमुदाय सभेस उपस्थित होता. ठाकरे यांचे सभास्थळी आगमन होताच फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली गेली.