नाशिक । Nashik
नवीन नाशिक भागात नंदिनी नदीलगत झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांच्या घरात पावसाळ्यात पाणी जात असल्यासंदर्भातील प्रश्नांवर चार वर्षापासुन भांडत असलेल्या नगरसेविका कल्पना पांडे यांनी आजच्या महपालिका स्थायी समिती बैठकीत रौद्ररुप दाखविले.
थेट सभापतीजवळच ठिय्या आंदोलन केल्यानंतर यांसंदर्भात तात्काळ बैठका घेऊन हा प्रश्न सोडवा असे निर्देश सभापती गणेश गिते यांनी प्रशासनाला दिले. या आदेशानंतर आता नाल्यात अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवीन नाशिक भागातील नंदिनी नदीलगत नाल्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे याभागात अनेक नागरिकांच्या घरात पावसाळ्यात पाणी शिरत आहे.
परिणामी नागरिकांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत असुन हा प्रश्न नगरसेविका कल्पना पांडे या गेल्या दीड दोन वर्षापासुन स्थायी, महासभा याठिकाणी मांडत आल्या आहे. मात्र अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आजच्या स्थायी बैठक पांडेताई यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले.
अचानक घडलेल्या प्रकारामुळे सभापती गोंधळून गेले. महापालिकेत ठराविक लोकांचीच कामे केली जात असल्याचा आरोप करीत त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन कामे का केली जात नाही, असे पांडे यांनी सुनावले.
यावर सभापतींनी शहर अभियंता संजय घुगे यांना खुलासा करण्यास सांगितले. यावेळी संबंधीत ठिकाणी नाल्यावर अतिक्रमण झाले असुन त्यांना नोटीसा देण्यात आल्या असुन हा विषय नगररचना विभागाकडे असल्याचे सांगितले. यात टोलवा टोलवी करु नका हा विषय महापालिकेचा असुन तात्काळ समन्वयाने सोडवा असे सभापतींनी सांगितले.
यानंतर नगररचना अधिक्षक अभियंता राजु आहेर म्हणाले, शहरातील नाल्यावरील अतिक्रमणासंदर्भात सर्व्हे करण्यासाठी एक समिती स्थापन झालेली असुन तिचा अहवाल समितीकडे आल्यानंतर समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर या प्रकरणात महापालिका प्रशासनाकडुन झालेली चुक बडगुजर यांनी सांगत तोरणानगरपासुन 10 मीटरचा नाला बंद का केला ? असा प्रश्न उपस्थित केला.
अखेर एकुणच प्रकरणाची गंभीरता लक्षात सभापतींनी हा प्रश्न सोडविण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी स्थायी सभापतींसोबत बैठक लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले.