<p><strong>लासलगाव। वार्ताहर Lasalgaon</strong></p><p>राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विकासकामांना सुरुवात करताच लगेचच करोना संकट ओढावल्याने सरकारने नागरिकांसाठी आरोग्याच्या सुविधांना प्राधान्य दिले. </p>.<p>या काळात आरोग्य, पोलीस, अन्ननागरी पुरवठा विभागाने अहोरात्र परिश्रम घेतले. नागरिकांनीही जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क वापरुन सोशल डिस्टन्स पाळावे. लासलगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे असून सहा महिन्यात तो कार्यान्वित होईल. महाविकास आघाडी म्हणजे सरकारची तीन चाके आणि नागरिकांचे एक चाक अशी चार चाकी असलेले वाहन आहे आणि ते आता विकासकामांच्या बाबतीत आणि जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सुसाट सुटणार असून वर्षानुवर्षे ती धावणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी केले आहे.</p><p>लासलगाव येथे विविध विकासकामांचे भुमिपूजन व लोकार्पण ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भुजबळ बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, मा. सरपंच कुसूमताई होळकर, उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार शरद घोरपडे, गटविकास अधिकारी संदिप कराड, उपअभियंता ढिकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश पाटील, लासलगाव ग्रामपंचायत प्रशासक सोनवणे आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.</p><p>यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, करोनानंतर राज्य शासनाने आता हळुहळू विकासकामांना न्याय देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाने मंजूर झालेल्या निधीची कामे तत्काळ पूर्ण करावीत. करोना संकटात राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाशी संबंधित अधिकारी, सेवक चोवीस तास कामात होते. त्यामुळे दरमहा 3.5 लाख टन ते 9 लाख टनापर्यंत रेशनचे वाटप दर महिन्याला करण्यात यश आले. यामध्ये प्रामुख्याने गरीब जनता, मोलमजूरी करणारे नोकरदार वर्ग तसेच परप्रांतीय यांचा समावेश होता. आपल्या राज्याने माणूस हा घटक समोर ठेवून करोना विषाणूचा मुकाबला केला. गोरगरीब जनता अन्नापासून वंचित राहू नये यासाठी शिवभोजन केंद्रातून आपण भूक भागविण्यासाठी प्रयत्न केले.</p><p>यात 10 रुपये दर असलेली शिवभोजन थाळीची किंमत 5 रुपये केली. केंद्रचालकांनी काही गरीब लोकांना मोफत जेवण दिले असेही भुजबळ म्हणाले. यावेळी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जयदत्त होळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.</p>