नाशिक । Nashik
उन्हाचा झळा तीव्र होत असून बाष्पीभवनामुळे धरणांतील जलसाठा झपाट्याने खालावत आहे.
सद्यस्थितीत जिल्हयातील २४ धरणांमध्ये ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी आजमितीला हे प्रमाण ३९ टक्के इतके होते. उपलब्ध जलसाठ्यावरच पुढिल दीड महिना जिल्हावासियांची तहान भागवायची असून उपलब्ध पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे आव्हान जिल्हाप्रशासमोर आहे.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात पावसाने शंभर टक्के हजेरी लावली असून त्यामुळे जिल्ह्यातील धरणांत समाधानकारक जलसाठा आहे.
गतवर्षी धरणे अोव्हर फ्लो होऊन अनेक नद्यांना पूर आला होता. जिल्ह्यात पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावल्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा फारशा जाणवल्या नाही. रब्बीसाठी व उद्योगांसाठी नियोजीत आवर्तन सोडूनही यंदा धरणात ३४ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
तर नाशिक शहराची तहान भागविणार्या गंगापूर धरणात ४९ टक्के जलसाठा शिल्लक अाहे. आता मे महिन्याचा पंधरवडा सुरु झाला असून उन्हाचा तीव्र झळा जाणवायला लागल्या आहेत. नदी व नाले अटले असून विहरिंनी तळ गाठला आहे. ग्रामीण भागात अनेक वाडया व वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
परिणामी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे धरणांतून पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरु आहे. तसेच बाष्पीभवनामुळेही जलसाठा खालावत आहे. मान्सूनचे जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मात्र, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता मान्सूनच्या आगमनला जुलै अखेर उजडत आहे. ते बघता हा उपलब्ध जलसाठयावर पुढिल दीड ते दोन महिने जिल्ह्याची तहान भागवावी लागणार असून अत्यंत काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे.