नाशिक । Nashik
केंद्र शासनाच्या वंदे मातरम् भारत मिशन अंतर्गत देशातून व परदेशातून विमान प्रवास करुन आलेल्या व्यक्तींना चौदा दिवस क्वारंटाईन करण्याच्या नियमानुसार शहरात आत्तापर्यत ७६२ जण विमान प्रवास करुन शहरात दाखल झाले आहे. यातील २८ जणांना हॉटेलात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने सर्वच राज्यांसाठी देशांतर्गत व परदेशातील विमान प्रवास करुन आलेल्या व्यक्तीसाठी करोना संसर्ग होऊ नये म्हणुन खास काळजी घेतली आहे. याकरिता वंदेमातरम् भारत मिशन सुरू करण्यात आले आहे.
यात परदेशातून व देशातील विविध राज्यातून विमान प्रवास करुन आल्यानंतर त्यांची विमानतळावरील आरोग्य तपासणी केली जाते. त्यानंतर संबंधीत व्यक्तींना त्यांच्या शहरात पाठविल्यानंतर हॉटेलात ठेवून त्यांची करोना चाचणी करुन ती व्यक्ती पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातात. चाचणी निगेटीव्ह आली तरी त्यांना हॉटेलात चौदा दिवस क्वारंटाईन ठेवले जाते.
अशाप्रकारे नाशिक शहरात आत्तापर्यत विमान प्रवास करुन आलेल्या ७६२ जणांना हॉटेलात ठेवण्यात येऊन त्यांची चाचणी केली असतांना यात २९ जण पॉझिटिव्ह निघाले होते. आता सध्या शहरात विविध हॉटेलात २८ जणांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे.