
शिवडे । वार्ताहर
सततधार पावसामुळे टोमॅटो पिकाचे आगार असलेल्या शिवडेसह पांढुर्ली, बोरखिंड, घोरवड परिसरात टोमॅटोचे मोठे नुकसान झाले असून लागवडीनंतर अवघ्या 20 ते 25 दिवसात टोमॅटो उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेली पावसाची संततधार थांबायचे नाव घेत नसून डोळ्यासमोर होत असलेले नुकसान पाहून बळीराजा निराश झाला आहे. हजारो रुपये खर्चून बांधणी केलेल्या टोमॅटो पिक हाताशी येण्यापूर्वीच पाण्याने खराब होत असून टोमॅटोची झाडे उपटून बांधावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटो पीक उपटून त्या जागी परत टोमॅटो लागवड करण्यासाठी मोठा खर्च येणार असून या परिस्थितीत हा खर्च न पेलवण्यासारखा आहे.
सध्या अतिरिक्त पाण्यामुळे पिकात पाणी साचून तसेच हवेची पूर्व-पश्चिम दररोज असणारी दिशा यामुळे पिकाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे आहे ते टोमॅटो पीक काढून नवीन लागवडीसाठी रोपवाटिकाकडे शेतकरी धावत आहेत. मात्र, रोपवाटिकाधारकांनी नव्या रोपांचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. खते, कीटकनाशके, औषधांचेही भाव सध्या वाढले असून शेतकऱ्याला पुन्हा हा सर्व लागवड खर्च केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
एवढे करुनही शेवटी पुर्नलागवड यशस्वी झाली नाही तर खर्च केलेले भांडवलही निघणार नाही. एकरभर टोमॅटो लागवडीसाठी लाखभर रुपये खर्च लागतो आणि त्यात पुर्नलागवड म्हणजे दुष्काळात तेरावा अशी सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे.