निर्यातबंदी असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनच्या वितरणास परवानगी

नंदुरबारच्या चौधरी बंधुंच्या प्रयत्नांना यश
निर्यातबंदी असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनच्या वितरणास परवानगी

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

निर्यातबंदी असलेल्या रेमडिसिवीर इंजेक्शनचे राज्यात वितरण करण्याबाबतची नंदुबार येथील हिरागृपचे डॉ.रविंद्र चौधरी व माजी आ.शिरीष चौधरी या बंधुंची संकल्पना राज्य सरकारने मान्य केली असून संपुर्ण राज्यात दोन तीन दिवसातच रेमडिसिवीर इंजेक्शनचा मुबलक प्रमाणावर साठा उपलब्ध होणार आहे.

याशिवाय केंद्र सरकारही निर्यातीच्या धोरणात बदल करणार आहेत. चौधरी बंधुंच्या या स्तुत्य संकल्पनेचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

राज्यातील रेमडिसीविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता या इंजेक्शनची निर्यात केंद्र सरकारने बंद केली आहे. मात्र, या कंपन्यांना स्थानिक देशात सदर इंजेक्शन वितरण करण्यास परवानगी नसल्याने तो साठा पडून आहे व इतर ज्या सात कंपन्यांना देशांतर्गत वितरणास परवानगी त्यांच्यावर ताण पडत आहे.

याबाबत येथील हिरागृपचे डॉ.रविंद्र चौधरी व माजी आ.शिरीष चौधरी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना आपात्कालीन परिस्थितीत निर्यात बंदी असलेला माल वितरीत करता येतो,

हवे तर ५० लाख व्हायल आम्ही उपलब्ध करुन देतो अशी ग्वाही दिली होती. ही संकल्पना श्री.फडणवीस व श्री.दरेकर यांना पटल्याने त्यांनी चौधरी बंधुंसह अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना.राजेंद्र शिंगणे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून याबाबत त्वरीत दखल घेवून कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

तसेच श्री.दरेकर यांनी पत्रकार परिषद घेवून ही संकल्पना मांडली होती. या संकल्पनेची राज्य सरकारने दखल घेतली असून निर्यातबंदी असलेला रेमडिसीवीरचा पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे.

याबाबत माहिती देतांना हिरागृपचे अध्यक्ष डॉ.रविंद्र चौधरी म्हणाले, गेल्या तीन दिवसांपासून मी व माजी आ.शिरीष चौधरी हे मुंबईत होतो. विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली पण ते नागपूरला होते. त्यांना आमची संकल्पना सांगितली.

निर्यातीचा माल कसा वितरीत करता येईल याबाबतची संकल्पना त्यांना आवडली. त्यांनी विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांना फोनवर समजावून सांगितले. गुजरात सरकारने ज्याप्रकारे निर्यातीच्या मालाला परवागनी दिली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही परवानगी द्यावी, जेणेकरुन रेमडीसिवीरचा तुटवडा भरुन निघेल.

ज्या पुरवठादार कंपन्या आहेत, त्यांच्याकडे माल आहे, परंतू त्यापेक्षाही जास्तीच्या इंजेक्शनची सध्या मागणी आहे. त्यामुळे ज्या निर्यातबंदी घातलेल्या सात कंपन्या आहेत, त्यांना देशात मालविक्रीस परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.

केंंद्र सरकारलाही पत्र दिले होते की, या कंपन्यांकडून प्रॉडक्शन करुन घ्यावे, त्यांना काही प्रमाणात निर्यातीचा माल विकण्यास परवानगी द्यावी. त्यांनाही ही संकल्पना आवडली. त्यामुळे दरेकर यांनी अन्न व औषधी प्रशासन मंत्री, आरोग्य मंत्र्यांंना याबाबतचे निवेदन दिले.

त्यांनी पत्रकार परिषद घेवून ही भुमिका मांडली. त्यामुळे कालपासून राज्य सरकारने हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. बहुतेक राज्य शासनाने सदर माल संपुर्ण राज्यभरात वितरणास परवानगी दिली आहे.

त्यामुळे आपण केवळ खान्देशासाठी इंजेक्शनचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, आता संपुर्ण राज्याला या इंजेक्शनचा पुरवठा होणार असून रुग्णांची सोय होणार आहे.

श्री.चौधरी पुढे म्हणाले, आपण देवेंद्र फडणवीस यांना सांगून केंद्र सरकारकडेही भुमिका सांगितली आहे. केंद्र सरकारनेदेखील निर्यातीच्या मालाबाबत बेनीफीट जसाच तसा ठेवून प्रॉडक्टला परवानगी देण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.

आमची ही योजना राज्य व केंद्र सरकारने स्विकारल्याने संपुर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे, याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com